https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

नाणीज येथे अंडरपास तर निवळीला थेट रस्त्यासाठी ग्रामस्थांनी घेतली नीलेश राणे यांची भेट

0 15
  • दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने मार्ग काढण्याचे निलेश राणे याचे निर्देश

रत्नागिरी : तालुक्यातील नाणीज येथून जाणाऱ्या मिऱ्या नागपूर महामार्गावर आजूबाजूच्या गावाच्या सुरक्षिततेसाठी अंडर पास व्हावा आणि मुंबई गोवा महामार्गावर निवळी बाजारपेठेत होणारा उड्डाणपूल ऐवजी सरळ महामार्ग व्हावा यासाठी स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि छोट्या व्यावसायिकांनी आज रत्नागिरी दौऱ्यादरम्यान माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेतली. यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढण्याच्या आणि आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन निलेश राणे यांनी यावेळी दिले.

रत्नागिरी तालुक्यातून मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण आणि मिऱ्या नागपूर महामार्गाचे काम सुरु आहे. मात्र काही ठिकाणी महामार्गाचे काम करताना स्थानिकांना संबंधित विभाग आणि ठेकेदारांनी विश्वासात घेतले नसल्याचे पुढे आले आहे. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी दौऱ्यावर आलेले भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांची संबंधित ग्रामस्थ, व्यापारी व्यावसायिकांनी भेट घेतली.

त्यामध्ये मिऱ्या नागपूर महामार्गावर नाणीज येथे काह दिवसापूर्वी एक दुर्दैवी अपघात होऊन दोघेजण मृत्युमुखी पडले. सातत्याने या भागात अपघात होत आहेत. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला लहानमोठी गावे आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी येथे महामार्गावर अंडर पास करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी मिऱ्या नागपूर महामार्ग विभागाचे उपव्यवस्थापक गोविंदा भैरवा तसेच अधिकारी राकेश सिंग आणि ठेकेदार उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्या या मागणीचा तातडीने विचार करा, यासाठी केंद्र सरकारकडून लागणारी मदत निश्चित करू असे निलेश राणे यांनी सांगितले तर महामार्गाच्या दोन्ही बाजुला बस स्टॉप देण्याचेही अधिकाऱ्यांनी मान्य केले. यावेळी नाणीज येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच मुंबई गोवा महामार्गावर निवळी बाजारपेठेत होणारा उड्डाणपूल ऐवजी सरळ महामार्ग व्हावा अशी मागणी स्थानिक व्यापारी आणि छोट्या व्यवसायिकांनी निलेश राणे यांच्याकडे केली. यासाठी निवळी येथे व्यापाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी महामार्ग अधिकारी राजेंद्र कुलकर्णी तसेच व्यापारी संघाचे अध्यक्ष संतोष पाध्ये आणि अन्य व्यापारी उपस्थित होते. या संदर्भात निवळी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. १३० हून अधिक व्यापारी आणि व्यावसायिक यावेळी उपस्थित होते. निवळी येथे उड्डाण पूल झाला तर बाजारपेठ नष्ट होईल यामुळे येथे कोणताही उड्डाणपूल न ठेवता सरळ मार्ग ठेवावा अशी मागणी व्यापार्यांनी केली. यासाठी आम्ही पाठीशी असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले तसेच यावेळी अधिकाऱ्यांशी बोलून यासंदर्भात बोलून लवकर तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. यावेळी भाजपा ओबीसी सेलचे भाई जठार, अनुसूचित मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय निवळकर, नित्यानंद दळवी, अन्य पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.