Ganesh Festival 2023 | परतीच्या प्रवासासाठी गुहागर आगारातून ४०७ गाड्या आरक्षित
- गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांसाठी गुहागर आगाराकडून उत्तम नियोजन
गुहागर : गणेशोत्सवासाठी यावर्षी विक्रमी संख्येने गावी आलेल्या गणेश भक्तांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून राज्य परिवहन विभागाचे गुहागर आगार सज्ज झाले असून आतापर्यंत आगारातून तब्बल ४०७ गाड्या बुक झाल्या आहेत. २३ सप्टेंबरपासून मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध भागात गुहागर आगारातर्फे या जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती गुहागरच्या आगार व्यवस्थापिका सौ. सोनाली कांबळे यांनी दिली.
दोन वर्षाच्या कोविड काळातील अनेक निर्बंधानंतर गेल्यावर्षापासून मुक्तपणे गणेश उसव साजरा करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणातील गणेशभक्त चाकरमानी आपापल्या घरी येऊन पोचले होते. ट्रेन, खाजगी ट्रॅव्हल्स, भाड्याच्या किंवा स्वतःच्या कार व एसटीच्या माध्यमातून गणेश भक्तांनी आपल्या घरी हा सण उत्साहात साजरा केला. परंतू, हे करत असतानाच या सर्वांचे लक्ष परतीच्या प्रवासाकडे लागले होते.
२३ सप्टेंबरपासून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. मात्र, या वर्षी त्यामधे जवळपास तीप्पट गाड्यांची भर पडली असून तब्बल ४०७ जादा गाड्यांचे बुकींग झाले आहे. यामध्ये मुंबई, पुणे, विरार, भाईंदर, नालासोपारा, ठाणे, बोरीवली, विठ्ठलवाडी, कल्याण अशा विविध मार्गावर या बसेस बुक करण्यात आल्या आहेत. या जादा गाडया असल्या तरी कोणत्याही प्रकारचा जादा भार प्रवाशांवर टाकलेला नसून सर्व साध्या दरातील तिकीटात प्रवाशांना सेवा उपलव्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
बुक झालेल्य जादा गाडया राज्यातील इतर आगारामधून मागविल्या असून आगारातून रोजच्या सुटणाऱ्या लोकल व लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या नियोजनावर त्याचा पारिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यात आत्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आगारातील वाहक – चालक, कार्यशाळा कर्मचारी व प्रशासकीय अधिकारी या सर्वांनी या वाहतूकीचे नियोजन केले असून गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही सौ. कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.