संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे
रत्नागिरी : मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली करू नये, असा आग्रह करीत यापूर्वी दोनदा संबंधित ठेकेदार कंपनीकडून टोल वसुली सुरू करण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून हाणून पाडला गेला असताना मंगळवारी राजापूर नजीकच्या हातिवले येथील टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्तात टोल वसुली करण्यास सुरुवात झाली आहे. विरोधाच्या पार्श्वभूमीवर शासन प्रशासन टोल वसुलीचा मुद्दा रेडू पाहत असल्यामुळे यावरून आता संघर्षाचे चिन्ह निर्माण झाली आहेत.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर शहरानजीक हातिवले येथे उभारलेला टोल प्लाझा मागील काही महिन्यांपासून टोल वसुलीकरिता खुला करण्याचे प्रयत्न संबंधित ठेकेदार कंपनीकडून सुरू आहेत. मात्र जोपर्यंत चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वसुली करू नये, असा मुद्दा उपस्थित करीत स्थानिकांसह वाहनधारकांनी यापूर्वीचे दोनदा झालेले प्रयत्न हाणून पडले होते. त्यानंतर डिसेंबर 2022 पासून राजापुरातील टोल वसुली बंद होती. महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली होऊ नये म्हणून स्थानिकांसह वाहनधारकांच्या बाजूने रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह अन्य पक्षीय लोकांनी रस्त्यावर उतरून ठेकेदार कंपनीच्या टोल वसलेला प्रखर विरोध दर्शवला होता. त्यावेळी झालेल्या आंदोलनादरम्यान या संदर्भात बैठक होऊन मगच टोल वसुली केली जाईल, असे ठरले होते.

राजापुरातील टोल वसुलीबाबत विरोधाचे वातावरण असतानाच मंगळवारी अचानक पोलीस बंदोबस्तासह हातिवले येथील टोल प्लाझा येथे वाहने थांबवून टोल वसुली करण्यास प्रारंभ झाला. पोलीस बंदोबस्त अचानक टोल वसुली सुरू झाल्यामुळे स्थानिकांसह वाहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.














