रत्नागिरी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचे आवाहन
रत्नागिरी दि. २५ : महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुखकारक करण्याला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. शासकीय तंत्रनिकेतन परिसरात कौशल्य विकास केंद्रामार्फत सुमारे 20 विविध अभ्यासक्रम राबविले जातात. कृषी पुरक अभ्यासक्रम सुरु करण्याला या केंद्राने प्राधान्य द्यावे अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यावतीने शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या परिसरात निर्माण करण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. सोबत पालकमंत्री उदय सामंत, कृषी मंत्री दादा भुसे हे होते. सुमोर अर्धा एकर परिसरात केवळ 7 महिन्यात उभारण्यात आलेल्या या देखण्या इमारतीच्या बांधकामाचे कौतुक करुन मुख्यमंत्री पुढे म्हणाले , राज्यातील विद्यार्थी, युवकांसाठी उद्योगधंद्यांच्या गरजानुसार विविध व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. या केंद्रातून अनेक गुणवंत विद्यार्थी निर्माण होतील असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रांरभी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक प्रमोद नाईक यांनी संस्थेच्या विविध अभ्यासक्रम व उपक्रमाबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत आत्मियतेने उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिंनीशी संवाद साधला.
या
प्रसंगी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य औदुंबर जाधव, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरज खंते, कौशल्य विकास केंद्राच्या प्राचार्या गौरीनंदा सावंत, कौशल्य विकासकेंद्राचे अभ्यास प्रमुख अक्षय पाटील यांच्यासह इतर प्राध्यापक, शिक्षकेतर वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.