रत्नागिरी समुद्रकिनार्‍याला उधाणाच्या लाटांचा तडाखा

मिर्‍या येथील नागरिकांच्या घराच्या आवारात समुद्राचे पाणी


रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून असलेला पाऊस तसेच पौर्णिमेमुळे समुद्राला आलेल्या उधाणामुळे किनार्‍यावर उंच लाटा धडकत आहेत. लाटांच्या या तडाख्यामुळे शहरानजीकच्या मिर्‍या येथील बंधारा अनेक ठिकाणी ढासळू लागला आहे. भरतीच्यावेळी उधाणाच्या लाटा नागरिकांच्या घराच्या आवारात घुसत असल्याने रहिवाशांची चिंता वाढली आहे.
या भागात पुन्हा समुद्राच्या लाटांचे पाणी थेट मानवी वस्तीत घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या पौर्णिमेमुळे समुद्राला उधाण आले आहे. उधाणामुळे किनार्‍यावरील घरांना धोका निर्माण होवू शकतो, अशी चिंता स्थानिक ग्रामस्थांना सतावते आहे. कोकणातील चारही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाल असला तरी दि.19 जुलैपर्यंत मुसळधार पावसासह समुद्र खवळलेला राहणार आहे. उधाणाच्या वेळी समुद्राचा लाटा मोठ्या प्रमाणात किनार्‍यावर धडकतात. यावेळी लाटा किनार्‍यावर आदळून पुन्हा समुद्रात जाताना किनार्‍यावरील बंधार्‍यांचे दगड आपल्यासोबत घेवून जातात. त्यामुळे किनार्‍यावरील बंधार्‍याला अनेक ठिकाणी भगदाड पडत आहे. सध्या जाकिमिर्‍या नजिकच्या उपळेकर बाग येथील बंधारा वाहून जाऊ लागला आहे. लाटांचा वेग वाढल्यास येत्या दोन-चार दिवसात बंधार्‍याला मोठे भगदाड पडण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी वर्तवली आहे.


मागील एकदोन दिवसांपासून निर्माण झालेली परिस्थती लक्षात घेत पंधरामाडच्या बाजून टेट्रापॉडस तयार ढासळणार्‍या बंधार्‍याला प्रतिबंध करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

दोन वर्षांपूर्वी लाटांमुळे भरकटून मिर्‍या किनार्‍यावर भंगारावस्थेत अडकून पडलेले जहाज आणि त्याच ठिकाणी उसळणार्‍या मोठ्या लाटा.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE