गुरुवारच्या आंजणारीतील अपघातामुळे गॅस काढण्यासाठी खबरदारीची उपाययोजना
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर लांजानजीक आंजणारी नदीवरील पुलावरुन नदीपात्रात कोसळलेल्या गॅसवाहू टँकरमुळे महामार्गावरील वाहतूक जवळपास 24 तासांहूनअधिक काळ बंद करण्यात आली आहे. दरम्यान, अपघातग्रस्त गॅसवाहू टाकीतील गॅस सुरक्षितरित्या दुसर्या टाकीत काढल्यानंतर रात्री 10.30 वाजेपर्यंत महामार्गावरील वाहतूक सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मुंबई गोवा महामार्गावर गुरुवारी (22 सप्टेंबर) महामार्गावरील आंजणारी पुलावरून गॅसवाहू टँकर नदीपात्रात कोसळल्याने संपूर्ण महामार्ग बंद ठेवण्यात आला होता. गुरुवारी दुपारी हा अपघात घडला होता. या अपघातात टँकरचा चालक जागीच ठार झाला होता. अपघातग्रस्त टँकर हा भारत पेट्रोलियमचा घरगुती गॅस वाहून नेणारा होता. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षेच्या कारणास्तव सर्व यंत्रणांनी एकत्रित येत महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवारी अपघात झाल्यापासून साधारण 4 वाजल्यापासून शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंत म्हणजेच जवळपास तब्बल 30 तास मुंबई-गोवा महामार्ग बंद ठेवण्यात आला होता. यामुळे अवजड वाहनांना महामार्गाच्या दोन्ही बाजूने थांबविण्यात आलेले होते. यामुळे अवघड वाहनांची महामार्गाच्या दोन्ही बाजूने गर्दी झालेली दिसत होती. तर अन्य सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली होती. यामध्ये रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक ही देवधे पावस व देवधे काजरघाटीमार्गे वळण्यात आली होती. अन्य लांब पल्ल्याची वाहतूक दाभोळे संगमेश्वर चिपळूण आणि दाभोळे मलकापूरमार्गे वळविण्यात आली होती.















