रत्नागिरीच्या रोजगार महामेळाव्यात दोन हजार १४० जणांना मिळाली नोकरी!

नोकरी मिळालेल्या युवकांच्या कुटुंबामध्ये आनंदोत्सव

रत्नागिरी : उद्योग विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या रोजगार महामेळाव्यात तब्बल दोन हजार 140 जणांना नोकरीचे पत्र वितरित करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी दिली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योग विभागाच्या वतीने राज्यभर रोजगार महामेळावे घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात आज पहिला रोजगार महामेळावा घेण्यात आला. या रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन 7 हजार 800 युवक युवतींनी नोंदणी केली होती तर जवळपास 3 हजार जणांनी ऑफलाईन नोंदणी केली होती. नोंदणी झालेल्या जवळपास 10 हजार उमेदवारांपैकी 4 हजार 428 जणांच्या मुलाखती आज पार पडल्या. त्यातील 2 हजार 140 जणांना नोकरीचे देकार (ऑफर) प्रमाणपत्र तात्काळ अदा करण्यात आले. तसेच 2 हजार 88 उमेदवारांना कौशल्य विकास विभागाकडे कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी संदर्भित करण्यात आले आहे. या 2 हजार 88 उमेदवारांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन भविष्यात त्यांनाही नोकरी मिळवून देण्यात येणार आहे.


रत्नागिरी, पुणे,सातारा, मुंबईतील 130 विविध कंपन्यांनी या मेळाव्यात सहभाग नोंदविला होता.
राज्याच्या इतर भागातही अशा प्रकारचे रोजगार महामेळावे घेण्यात येणार असल्याचे ना. सामंत यांनी जाहीर केले आहे. विशेषतः सीमावर्ती भागातील रोजगार मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE