नाणीजमध्ये दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन
नाणीज, दि. १९ : जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा जन्मोत्सव शुक्रवार (२१ ऑक्टोबर) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जन्मोत्सव वारी उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून दोन दिवस अनेक कार्यक्रम होणार आहेत.

पारंपरिक पद्धतीने होणारा हा सोहळा दोन दिवस असणार आहे. शुक्रवारी 21 ऑक्टोबर रोजी सकाळी आरती, पूजेनंतर 9 वाजता महा मृत्यूंजय सप्तचिरंजीव यागाने सोहळा सुरु होईल. यावेळी अन्नदान विधी सुरु होईल. सकाळी 10 ते 1 चरण दर्शन सोहळा असेल. त्याचवेळी रत्नागिरी जिल्हा सेवासमितीचे भजन असेल. त्यानंतर देवदेवतांना मिरवणुकीने जाऊन सोहळ्याचे निमंत्रण दिले जाईल. प्रभू रामचंद्र मंदिर मिरवणुकीचे यजमानपद जालना जिल्हा सेवा समितीकडे आहे. वरद चिंतामणी मंदिर मिरवणुकीचे यजमानपद नांदेड जिल्हा सेवा समितीकडे आहे व नाथांचे माहेर मिरवणुकीचे यजमानपद लातूर जिल्हा सेवा समितीकडे आहे. संतशिरोमणी गजानन महाराज मु‘य मंदिर मिरवणुकीचे यजमानपद संभाजीनगर जिल्हा सेवा समितीकडे आहे.
दुपारी 12 पासून उत्सवमूर्तींची मिरवणूक असेल. ती नाथांचे माहेरहून निघेल व गणपती मंदिर, प्रभू रामचंद्र मंदिर मार्गे गजानन महाराज मंदिर येथे पोहोचेल. दुपारी 2 ते 5 श्रींच्या पालखीचे स्वागत, पालखी परिक्रमेत वसई सेवा समितीचे भजन असेल. रात्री 7 नंतर संतमहंतांचे प्रवचन होईल. रात्री 8.30 पासून संतपीठावर जिल्हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल.
21 ऑक्टोबर हा सोहळ्याचा मुख्य दिवस आहे. या दिवशी सकाळी यागाची समाप्ती, याग पूर्णाहूती, 2 ते 6 चरण दर्शन व भक्त जोडो अभियान सत्कार व प्रवचनकार पदवीदान सोहळा आहे. रात्री 7.30 ते 8.30 प.पू. कानिफनाथ महाराजांचे अमृतमय प्रवचन असेल. त्यानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अमृतमय प्रवचन असेल. त्यानंतर 151 मृदंग वाजवून जन्मोत्सव सोहळ्याला सलामी दिली जाईल. रात्री दहा वाजता जगद्गुरू श्रींचा जन्मोत्सव सोहळा असेल. त्यानंतर देवाला साकडे घातले जाईल. श्रींच्या पालख्या स्वस्थानी प्रस्थान करतील व सोहळ्याची सांगता होईल.
सुंदरगडावर या सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. भाविकांत उत्साह आहे. मोठ्या संख्येने भाविक नाणीजला येणार आहेत. सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मराठवाडा पिठातून पायी दिंडी 5 ऑक्टोबरला निघाली आहे. दिंडीचे हे 26 वर्ष आहे. 450 किलो मीटरचा हा प्रवास आहे. त्यात 300 भाविक सहभागी आहेत. या दिंडीचे प्रमुख गणी अहमद सय्यद हे मुस्लिम समाजातील स्वामीजींचे निसिम शिष्य असून गेले सव्वीस वर्षापासून पायी दिंडी नाणीज घेऊन येत आहेत.
तसेच दुसरी दिंडी उत्तर महाराष्ट्र पीठातून 30 सप्टेबरला निघाली आहे. तिचा प्रवास 600 किलो मीटरचा आहे. त्यात 300 भाविक सहभागी झाले आहेत. त्यांचे हे 18 वे वर्ष आहे. सोहळ्यादिवशी त्यांचे सुंदरगडावर आगमन होईल.














