रत्नागिरी : आविष्कार संस्थेच्या सौ. सविता कामत विद्यामंदिरमध्ये दि. १९ व २० ऑक्टोबर २०२२ रोजी कोजागिरी निवसप्रकल्प व दिवाळी कार्यक्रम पार पडला. शाळेतील मुलांनी एक रात्र आपल्या कुटुंबियांपासून बाजूला शाळेत रहाण्याचा हा कार्यक्रम होता.


या वर्षी ‘चांदणे कलाविष्काराचे’ या नावाने हा कार्यक्रम सजला होता. संध्याकाळी विद्यार्थी शाळेत आले. सर्वांची प्रार्थना झाली. श्री. ढालकर सर यांनी मिमेक्रीचा कार्यक्रम सादर केला. यामध्ये गणपतीच्या गाण्यावर गणपतीचे चित्र रेखाटन, विविध पक्ष्यांचे आवाज, बोलक्या बाहुल्याचा खेळ, तसेच माती पासून सोप्या सोप्या वस्तू तयार करणे या गोष्टी मुलांना दाखवल्या. विविध कलाविष्काराचा असणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना आनंदित आणि उल्हसित करून गेला. त्यानंतर सर्वांसाठी मिसळ पाव हा मुलांचा आवडता खाऊ होता. पालकवर्गाने आणि विद्यार्थी शिक्षक यांनी काही गीते, नृत्य सादर केली.
दि. २० रोजी शाळेचा परिसर किल्ला, आकाशकंदील, रोषणाई यांनी झगमगत होता. रात्री विद्यार्थ्यांना चांदण्यातली सफर घडवली. मसला दूध पिऊन विद्यार्थी शाळेतच झोपले. सकाळी मुलांना उटणं, तेल, शोभिवन्त फटाके, फराळ असा दीपावली सणाचा अनुभव देण्यात आला. मुलांनी नवीन कपडे घालून किल्ल्यासमोर फटाके फोडले. त्या नंतर दिवाळीचे पाच दिवस यामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी,नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन व भाऊबीज हे कार्यक्रम साजरे करण्यात आले.
या कार्यक्रमाचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली जोशी यांनी माहिती दिली. दिवाळीची गाणी सादर करण्यात आली. त्यानंतर सर्वांना दिवाळीचा फराळ देण्यात आला.














