संगमेश्वर : मागील काही वर्षांपासून संगमेश्वरवासीय रेल्वे प्रवासी जनतेची मागणी असलेल्या नेत्रावती तसेच मत्स्यगंधा एक्सप्रेसला संगमेश्वर थांबा मिळावा यासाठी आंदोलने पाठपुरावा करूनही रेल्वेकडून दखल घेतली न गेल्याने आंदोलनकर्त्याना आता संगमेश्वर जनतेची साथ मिळाली आहे. त्यांच्या माध्यमातून संगमेश्वर मधून या गाड्यांच्या संगमेश्वर थांब्यासाठी मागणी करणारी हजारो पत्रे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पाठवली जाणार आहेत.

संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात नेत्रावती व मत्स्यगंधा या एक्स्प्रेसना थांबा मिळण्यासाठी गेली तीन वर्षे निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर फेस ग्रुप सातत्याने प्रयत्न करत आहे. कोकण रेल्वे प्रशासन वेळोवेळी ही ना ती सबब सांगून थांबा देण्याबाबत आडमुठेपणा दाखवत असल्याचा आरोप यासाठी पाठपुरावा करणारे पत्रकार संदेश जीमन यांनी सांगितले.
दरम्यान, यासाठी आता संगमेश्वरवासीय जनतेनेही या आंदोलनात उतरण्याचे ठरविले आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयात संयुक्त बैठक घेण्याबाबतची हजारो मागणी पत्रे धाडण्याचा सपाटा संगमेश्वरवासीय जनतेकडून होत आहे.
तालुक्यातील विविध स्तरातील नागरिक यासाठी मागणीसाठी रेल्वे राज्यमंत्र्यांना पत्रे पाठवून थांब्यासाठी पाठपुरावा करत आहेत. यासाठी संतोष खातू (9860353231) आणि दादू भिंगार्डे (9890371415) यांना संगमेश्वर बाजार पेठ येथे, तर देवरूखमध्ये निखील कोळवणकर (9420907388) यांना संपर्क करून आपले संगमेश्वर रेल्वे थांब्याबाबतचे अर्ज घेऊन ते भरून द्यावेत व या अभियानाला भरघोस पाठिंबा द्यावा, असे आवाहन संगमेश्वर तालुक्यातील सर्व प्रवासी वर्गाने केले आहे.














