शहीद सुभेदार अजय ढगळे यांना रत्नागिरी विमानतळावर श्रध्दांजली

उद्या सकाळी चिपळूणला पार्थिव मुळगाव नेणार

रत्नागिरी : भारत-चीन सीमेवर देशसेवा बजावताना शहीद झालेले सुभेदार अजय ढगळे यांचे पार्थिव आज सायंकाळी रत्नागिरी विमानतळावर पोहचले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीकांत गायकवाड, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांनी शहीद सुभेदार अजय ढगळे यांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली.


2STC मडगाव (गोवा) येथील एक ज्युनिअर ऑफीसर सुभेदार श्री. आलम व 17 जवान यांनी गार्ड ऑफ ऑनर दिले. 108 इंजिनिअर रेजिमेंटरचे मेजर शिवकुमार एस.एन. यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. तटरक्षक दलाचे स्टेशन कमांडर , तटरक्षक दलाचे जवान, पोलीस विभागाचे अधिकारी, माजी सैनिकांचे प्रतिनिधी, पत्रकारांचे प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण, मोरवणे गावातील ग्रामस्थांचे प्रतिनिधी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे प्रतिनिधी गणेश धुरी यांनी यावेळी शहीद अजय ढगळे यांना श्रध्दांजली वाहिली.


विमानतळावरुन सुभेदार ढगळे यांचा पार्थिव उद्या सकाळी 5.15 वाजता त्यांच्या चिपळूण येथील मूळ गावी मोरवणे येथे नेण्यात येणार आहे. चिपळूण तालुक्यातील बहादूरशेख नाक्यापासून मोरवणे गावापर्यंत शहीद सुभेदार ढगळे यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.


भारत-चीन सीमेवर रस्ता बनविण्यासाठी जागची रेकी करण्यासाठी गेलेले मोरेवणे गावचे सुपुत्र सुभेदार अजय शांताराम ढगळे हे देशसेवा करत असताना शहीद झाले. शहीद अजय ढगळे हे कारगील याआधी झालेल्या लढाईमध्ये टायगर हिल जिंकणाऱ्या जांबाज बहादुर टिममध्ये देखील होते. त्यांच्या निधनाने चिपळूण तालुक्यासह जिल्हयात शोककळा पसरली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE