रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूणजीतच्या परशुराम घाटातील चौपदरीकरणा अंतर्गत सुरू असलेले बहुतांश काम पूर्ण झाल्यामुळे मागील 16 दिवसांपासून अंशतः वाहतूक सुरू असलेला हा घाट गुरुवारपासून 24 तास वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
चिपळूण नजीकच्या परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी दिनांक 25 एप्रिलपासून दिनांक १० मे पर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेऊन काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले होते. आता हे काम बहुतांश पूर्ण झाल्यामुळे गुरुवारपासून मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून होणारी वाहतूक नियमितपणे सुरू झाली आहे.

याआधी 25 एप्रिल पासून दुपारी बारा ते सायंकाळी पाच या वेळेत हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवला जात होता. या कालावधीत घाटातून होणारी वाहतूक पर्यायी मार्गे वळवण्यात आली होती.
मात्र आता गुरुवारपासून हा घाट 24 तास वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.














