रत्नागिरी : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर्व मोसमी पावसाने सलामी मी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला.
भारतीय हवामान खात्याने अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 9 ते 12 जून या कालावधीत कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा दिला आहे. या कालावधीत नागरिकांनी अलर्ट राहण्यास सुचित करण्यात आले आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असल्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन हवामान खात्याच्या इशारानुसार जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दरम्यान हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार रत्नागिरी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुमारे दहा मिनिटे पावसाची मुसळधार सर कोसळली. गेले काही दिवस कडक उन्हामुळे रस्ते तापलेले असल्यामुळे पुढील काही वेळातच रस्त्यावर साचलेले पाणी जिरून गेल्यामुळे पाऊस खरंच पडला होता का अशी परिस्थिती निर्माण झाली.
शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास देखील रत्नागिरी परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. पाणीटंचाईने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. लवकरच मोसमी पावसाला सुरुवात होऊन यावर्षीच्या पाणीटंचाईपासून मुक्ती मिळेल, या आनंदात नागरिक आहेत.














