गोपाळगडावर उद्या फडकविणार भगवा ध्वज!

गुहागर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन करणाऱ्या शिवतेज फाउंडेशन, गुहागर व तमाम गुहागरवासीय यांच्यावतीने दि. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने भव्य शिव पादुकांच्या रथाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ९ वा. शृंगारतळी तर १० वा. गुहागर येथून शिवरथ यात्रा काढण्यात येणार आहेत.


शृंगारतळी जानवळे फाटा येथून सकाळी ९ वाजता मोठ्या दिमाखात असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत छ. शिवाजी महाराजांच्या पादुकांची पालखीतून शिवरथ यात्रा काढण्यात येणार आहे. तसेच गुहागरमधून शिवाजी चौक येथून सकाळी १० वाजता शिवरथ यात्रा निघणार आहे. गुहागर बस स्थानक येथे मळण येथील शिवकालीन साहसी खेळाच्या कसरती सादर केल्या जाणार आहेत. शिवाय कीर्तनवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर मंडळाकडून वारकरी परंपरा म्हणून रिंगण घातले जाणार आहे. तसेच हेदवी येथील विद्यार्थ्यांचे झांज पथक व मोटारसायकल रॅली या मिरवणुकीची शोभा वाढवणार आहेत. बाजारपेठ मार्गे श्री देव व्याडेश्वर मंदिर, ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी मंदिरात भेटीला जाईल. तेथून ११.३० वाजता वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिरात आगमन होईल. याठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याचे ब्रह्मवृंदाच्या मंत्रोघोषात पूजन व जगदंबेची भेट होईल. यावेळी गुहागर बाजारपेठ व वरचापाट, मोहल्ला, बाग याठिकाणी पादुकांचे पूजन केले जाणार आहे.

देवस्थानच्यावतीने समस्त शिवप्रेमींसाठी प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तिथून शिवरथ यात्रा वरचापाट बाग, रानवी मार्गे अंजनवेल मध्ये दाखल होणार आहे. याच वेळी शृंगारतळी येथून निघालेली शिवरथ यात्रा मोठ्या दिमाखात पालपेणे, साखरीबुद्रुक, रानवी मार्गे अंजनवेल येथे येणार आहे. त्यानंतर एकच शिवरथ यात्रा अंजनवेल येथील किल्ले गोपाळगड येथे जाणार आहेत. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
पादुका पूजन व ध्वजारोहन करून शिवजयंती उत्सवाची सांगता होणार आहे. या शिव जन्मोत्सव सोहळ्यासाठी तालुक्यातील असंख्य शिवभक्त व गुहागरवासीय उपस्थित राहणार आहेत.
गोपाळगड किल्ला विजापूरच्या आदिलशहाने १६ व्या शतकात बांधला. इ.स. १६६० मध्ये शिवछत्रपतींनी तो जिंकला. शिवाजी महाराजांच्या मृत्यनंतर मोगल आक्रमणाच्या धामधुमीचा फायदा घेऊन सिद्दी खैरातखानने तो इ.स. १६९९ मध्ये जिंकला. त्यानंतर इ.स. १७४४ मध्ये तुळाजी आंग्रेने तो जिंकेपर्यंत तो सिद्दीच्याच ताब्यात राहिला. या काळात सिद्दीने किल्ल्याचा विस्तार करुन त्यात सुधारणा केल्या. तर नंतर तुळाजी आंग्रेनेही त्याचा विस्तार केला. इ.स. १८१८ रोजी कर्नल केनडी याने किल्ल्याचा ताबा घेतला व नंतर स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत तो ब्रिटीशांच्याच ताब्यात होता. तर प्रश्न राहतो या किल्ल्याला गोपाळगड नाव कसे पडले? आपणास माहिती असेल तुळाजी आंग्रे हे कृष्णभक्त होते. त्यांनी जेव्हा हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा याचे नाव गोपाळगड करण्यात आले. या किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवतेज फाऊंडेशन, गुहागर व समस्त गुहागर वासीयांनी पुढाकार घेतला आहे.

हे देखील वाचा : Konkan Railway | चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारीपासून

 

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE