उरण दि १ (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र राज्य शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत पर्यावराणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम राबवला जातो. या अंतर्गत निसर्गाच्या भूमी, जल, अग्नी, वायु व आकाश या पंचमहाभुतांवर लक्ष केंद्रीत करण्यात येते. या उपक्रमातुन वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करुन पर्यावरण सुधरणेकामी शाश्वत प्रयत्न करण्यात येतात.
या उपक्रमामध्ये उरण नगरपरिषदेने सहभाग नोंदवला होता. याकामी दिनांक २ मे ते २५ मे या कालावधीत त्रयस्थ यंत्रणेमार्फत उरण नगरपरिषद क्षेत्राचे मुल्यांकन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने, राज्य शासनाने दि. २७ सप्टेंबर रोजी जाहिर केलेल्या निकालानुसार कोकण महसुली विभागातुन उरण नगरपरिषदेस उत्तेजनार्थ पारितोषीक मिळाले असून रु.५० लक्ष असे पारितोषीकाचे स्वरुप आहे.
या प्रसंगी उरण विधानसभा क्षेत्राचे आमदार महेश बालदी यांनी उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव, स्वच्छता निरिक्षक हरेश तेजी, बांधकाम अभियंता निखिल ढोरे, झुंबर माने, विशाल गायकवाड व नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी/ कर्मचारी यांचे अभिनंदन केले. उरण नगर परिषदेस मिळालेल्या पारितोषिकामुळे नगर परिषदेत आनंदाचे वातावरण आहे.
मुख्याधिकारी यांनी सदर उपक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केलेबद्दल स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी, नगरपरिषदेचे सर्व विभागप्रमुख, कर्मचारी, सफाई कामगार व शहरातील नागरिकांचे आभार मानले व पुढे येऊ घातलेल्या माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा मनोदय व्यक्त केला. माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत ४१४ नागरी स्थानीक संस्था व सुमारे २२२१८ ग्रामपंचायतीनी सहभाग घेतला होता.
