उरण दि १(विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागाकडून कृषी क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणारे आदर्श शेतकरी प्रकाश शांताराम ठाकूर यांना २०२१ चा “वसंतराव नाईक कृषीभूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रविवार दि. २९/०९/२०२४ रोजी मुंबई वरळी येथील एन.एस.सी.आय.च्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने भव्य सत्कार व पुरस्कार वितरण समारंभ महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन यांच्याहस्ते प्रकाश शांताराम ठाकूर यांना कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शासनाकडून सन्मानचिन्ह, शाल, पत्नीला साडी व इतर भेटवस्तु देवून प्रकाश ठाकूर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. राज्याचे उपमुख्य मंत्री श्री. अजितदादा पवार, राज्याचे कृषीमंत्री श्री. धनंजय मुंडे, राज्याचे सचिव कृषी जयश्री भोज, राज्याचे आयुक्त कृषी श्री. रविंद्र भिनवडे यांचे प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र राज्याचे सर्व कृषी अधिकारी व निमंत्रीत महाराष्ट्रातील शेतकरी यांच्यासह हजारांच्यावर उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
कृषीभूषण प्रकाश ठाकूर यांना यापूर्वी कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट व उल्लेखनिय कामगिरी बद्दल तालुका, जिल्हा पातळीवरील अनेक कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे २०१५ ला राज्यस्तरीय वसंतराव नाईक कृषी पुरस्कार, राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त २०१०-२०११ महाराष्ट्र शासनाच्या वतीने गौरविण्यात आले, रायगड जिल्हा परिषदेकडून कृषीनिष्ठ पुरस्कार २०१३, आदर्श शेतकरी २०१५ पुरस्कार,प्रतिष्ठेचा व मानाचा “रायगड भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने २०१४ ला त्यांची कोकण विभागातून व ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग व रायगड जिल्ह्यातून एकमेव निवड करून “उद्यानपंडीत” पुरस्काराने २०१७ ला सन्मानित करण्यात आले.आदर्श शेतकरी प्रकाश शांताराम ठाकूर यांना २०२१ चा “वसंतराव नाईक कृषीभूषण” पुरस्कार मिळाल्याने विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, राजकीय नेते, शेतकरी, कामगार वर्ग तसेच मित्र वर्गांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
