चिपळूण : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषेतील लोप पावत चाललेले शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, लोकगीते यांचे पुस्तक प्रकाशन सोहळा व चिपळूण नगर परिषद व अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या सहयोगाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त २ अंकी नाटक ‘सागर प्राण तळमळला’ या कार्यक्रमास राज्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित राहून संबोधित केले.
यावेळी चिपळूणच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच उद्योगमंत्री म्हणून चिपळूणच्या विकासात योगदान देण्याचे काम यापुढे अविरत चालू राहिल असा विश्वास सर्वांना दिला.
राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मराठी बोलूनच राज्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक परदेशामधून आणली असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ठामपणे सांगितल. तसेच मराठीचा आग्रह हा सर्वांनीच धरावा, असे आवाहन केले.
यावेळी चिपळूणच्या मुख्याधिकाऱ्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाबद्दल पालकमंत्र्यांनी कौतुक केले. हे प्रेरणादायी पुस्तक आहे आणि हा राज्यात सरकारी अधिकाऱ्यांना आदर्श निर्माण केला आहे, असे ते म्हणाले.
यावेळी चिपळूणचे आमदार शेखर निकम व माजी आमदार सदानंद चव्हाण यांसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच चिपळूणकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
