महाड (वीर), माणगावला प्रत्येकी एक राखीव डबा ठेवून गाडी दादरपर्यंत चालवण्यासाठी निवेदन
रत्नागिरी : कोव्हीडपूर्व काळात रत्नागिरी दादर पॅसेंजरला दोन आरक्षित डबे होते तसेच संगमेश्वर, चिपळूण व खेड येथे प्रत्येकी एक अनारक्षित डबा उघडत असे. मात्र हातात असे नाही. त्यामुळे ही गाडी पूर्ववत दादरपर्यंत चालवण्यासह संगमेश्वर चिपळूण खेडला राखीव अनारक्षित डबे ठेवण्याची मागणी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन वीस वर्षे जुनी असलेली रत्नागिरी दादर पॅसेंजर पूर्वीप्रमाणे दादरपर्यंत न नेल्यास प्रवाशांना आक्रमक पवित्रा स्वीकारावा लागेल, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे

रत्नागिरीच्या उत्तरेकडील स्थानकांतून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये चढणे हे अद्यापही एक दिव्यच आहे. गाड्या संबंधित स्थानकांत पोहोचण्याआधीच गर्दीने ओसंडून वाहत असल्यामुळे आरक्षण असूनही एखाद्याला आपली आरक्षित जागा मिळेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे, येथील प्रवाशांना त्या त्या स्थानकात उघडणाऱ्या अनारक्षित डब्यांचा मोठा आधार होता. परंतु आता आरक्षणही नाही आणि हक्काचे अनारक्षित डबेही नाहीत अशी येथील प्रवाशांची व्यथा आहे.
कोरोनानंतर सर्व गाड्या पूर्ववत झाल्यानंतही कोकण रेल्वेने वरील सुविधा अद्याप पूर्ववत केलेल्या नाहीत.
कोकण रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात दिवा वीर व पुढे दिवा खेड गाडी चालत असे. ज्या स्थानकांनी आणि प्रवाशांनी खऱ्या अर्थाने कोकण रेल्वेचे उद्घाटन केले त्या माणगाव, महाड, खेड तालुक्यातील प्रवाशांची आजची स्थिती दयनीय आहे. दादर चिपळूण गाडीची मागणी अद्यापही पूर्ण केली जात नाही.
रेल्वेने ५०१०४ रत्नागिरी दिवा पॅसेंजरला काही आरक्षित डबे द्यावेत तसेच संगमेश्वर, चिपळूण, खेड येथे उघडणारे अनारक्षित डबे पूर्ववत करावेत, महाड (वीर स्थानक) व माणगाव तालुक्यांना देखील प्रत्येकी एक अनारक्षित डबा राखीव ठेवावा तसेच ५०१०४/५०१०३ रत्नागिरी पॅसेंजर दादरपर्यंत पूर्ववत चालवावी, अशी आग्रही मागणी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींकडे करण्यात आली आहे
मा. श्री. रावसाहेब दानवे, मा. रेल्वे राज्य मंत्री
मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र
मा. श्री. देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
मा. श्री. नारायण राणे साहेब, मा.केंद्रीय मंत्री
मा. श्री. सुनील तटकरे साहेब, मा. खासदार (रायगड)
मा. श्री. विनायक राऊत साहेब, मा. खासदार (रत्नागिरी-सिंधुदुर्ग)
मा. श्री. योगेश कदम साहेब, मा. आमदार (दापोली-मंडणगड-खेड)
मा. श्री. शेखर निकम साहेब, मा. आमदार (चिपळूण-संगमेश्वर)
मा. श्री. भरतशेठ गोगावले साहेब, मा. आमदार (महाड-माणगाव-पोलादपूर)
मा. आदितीताई तटकरे, मा. आमदार (श्रीवर्धन)
मा. श्री. उदय सामंत साहेब, मा. आमदार (रत्नागिरी)
मा. श्री. भास्कर जाधव साहेब, मा. आमदार (गुहागर)
मा. श्री. प्रवीण दरेकर साहेब, मा. आमदार यांचे लक्ष वेधून घेण्यात आले असून वरील मागण्यांची तातडीने पूर्तता करण्याची मागणी करण्यात आली आहे.














