परस्परांवर धडकून घडली दुर्घटना ; महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
रत्नागिरी : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा दर्ग्याजवळ साखरेची पोती भरलेल्या दोन ट्रकने पेट घेतल्याने परिसरात घबराट पसरली आहे. सांगोल्याहून जयगडच्या दिशेने जाणाऱ्या दोन ट्रकची एका मागून एक धडक झाल्याने ट्रक पलटी होऊन दोन्ही ट्रकने पेट घेतला आहे. हातखंबा येथील वाहतूक पूर्णपणे थांबवली आहे.
सुदैवाने दोन्ही ट्रकचे चालक सुखरूप बाहेर पडले आहेत. तत्काळ जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका देखील घटनास्थळी पोहोचली आहे. रत्नागिरी येथील नगरपालिकेचे अग्निशमक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणण्याचे काम करत आहे.
















