राज्य सरकारसोबतची चर्चा यशस्वी
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यांची सरकारसोबतची चर्चा यशस्वी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली.
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी संपात सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शैक्षणिक संस्थांसह कार्यालयांच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला होता. विविध संघटनांचा यात सहभाग असल्यामुळे सरकारी कार्यालये कर्मचाऱ्यांविना ओस पडलेली पाहायला मिळत होती. सोमवारी संपावरील कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेतची चर्चा यशस्वी झाली. यावेळी झालेल्या बैठकीनंतर राज्यस्तरावरून संघटनांकडून संप मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली.

