रत्नागिरीला राज्यातील सर्वात सुंदर नगर परिषद बनवण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे : ना. उदय सामंत

नगर परिषदेचा १४७ वा स्थापना दिन साजरा

रत्नागिरी : महाराष्ट्रातील सर्वात सुंदर रत्नागिरी बनविण्यासाठी विकास कामे करणे ही आपली जबाबदारी आहे. आपले कर्तव्य आहे आणि आपण त्यासाठी कटिबध्द आहोत, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, मारुती मंदीर येथे रत्नागिरी नगरपालिकेचा 147 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.


यावेळी रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, माजी नगराध्यक्ष मिलींद किर, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वरी शेटये, माजी नगराध्यक्ष राहुल पंडीत तसेच राजन शेटये, माजी उपनगराध्यक्ष रोशन फाळके तसेच माजी नगरसेवक यांच्या व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी नागरिकही मोठया संख्येने उपस्थित होते.


पालकमंत्री उदय सामंत  म्हणाले की, लोकप्रतिनिधीनी रत्नागिरीचा विकास साधताना येथील अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्यही मोलाचे आहे. नगर पालिकेमध्ये अधिकारी कर्मचारी यांचे काम हे कसोटीचे काम असते, म्हणून त्यांचे कौतुक करणे आवश्यक आहे. शारीरीक परिस्थितीवर मात करुन अधिकारी म्हणून उत्कृष्ठ काम करणाऱ्या रत्नागिरीचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याबद्दल त्यांनी गौरवउद्गार काढले. नगरपालिकेतील सफाईकामगारांचाही मान सन्मान ठेवला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्वात सुंदर रत्नागिरी बनविण्यासाठी विकास कामे करणे ही आपली जबाबदारी आहे , आपले कर्तव्य आहे आणि आपण त्यासाठी कटिबध्द आहोत असे ते म्हणाले.


पालकमंत्री म्हणाले मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे यांनी नगरपालिका स्थापना दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आपण कुटुंब म्हणून सर्व एकत्र येतो, विचारांची देवाण घेवाण होते, यातून एक चांगली ऊर्जा मिळते. हाच दृष्टीकोण ठेवून हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुढच्या नगरपालिका स्थापना दिनी  विकासाची कामे,  येथील अधिकारी कर्मचारी यांचे योगदान हे सर्वांसमोर येण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करा असे निर्देश त्यांनी दिले. पुढच्या वर्षीचा  01 एप्रिल हा नगरपालिकेच्या नवीन इमारतीमध्ये साजरा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

विकास कामे करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा, रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या 6 भारतरत्नांचे ऐतिहासिक 15 फुटांचे चेहरे हे रत्नागिरी शहरामध्ये करण्यासाठी तसेच रत्नागिरी येथे ध्यान केंद्र करण्यासाठी नगरपालिकेला निधी वर्ग केल्याची माहिती त्यांनी दिली.


विकासाची कामे करत असताना आपण सर्वांनी कुटुंब म्हणून काम केले पाहिजे. आपण नागरिकांचे देण लागतो या भावनेतून सर्वांनी काम केले तर रत्नागिरी ही महाराष्ट्रातील अतिशय चांगली नगरपालिका होण्यासाठी वेळ लागणार नाही. रत्नागिरीला ऐतिहासिक वारसा आहे आणि तो ज्वलंतपणे सर्वांपुढे ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे असे ते म्हणाले.
कार्यक्रमामध्ये उपस्थित माजी नगराध्यक्षांचा यावेळी सत्कार करण्यात आला.


यावेळी माजी नगराध्यक्षांनी आपले मनोगतपर भाषण यावेळी केले. रत्नागिरी नगर पालिकेत जास्त काळ सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच नगरपालिकेमधील उत्तम काम करणाऱ्या जितू विचारे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE