रत्नागिरी : परीक्षा संपल्याने लांजा गावी आलेल्या दोन मुलांचा भांबेड येथे मुचकुंदी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. ही मुलं सुट्टी तसेच आजीच्या वाढदिवसाचे निमित्त साधून लांजा तालुक्यातील गोवीळ येथील गावी आली होती.
विरार येथून दिनांक नऊ एप्रिल रोजी मयुरी कमलेश घोसाळकर (15) तसेच सुशील गुंडाप्पा तांबळे (14) ही दोन शाळकरी मुलं आजीच्या वाढदिवसाचे निमित्त साधून गोवीळ येथील बौद्धवाडीमध्ये आली होती. मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसमवेत भांबेड येथील मुचकुंदी नदीच्या पात्रावर कपडे धुणे तसेच आंघोळ करण्याच्या निमित्ताने मयुरी आणि सुशील देखील गेला होता.
नदीत आंघोळ करण्याच्या मोहापायी आधी मयुरी घोसाळकर हिने नदीपत्रात उडी घेतली. तिला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात गटांगळ्या खाऊ लागताच तिने मदतीला आईला हाक मारली. यावेळी जवळच असलेला सुशील तांबळे यांनी मयुरीच्या मदतीसाठी नदीपात्रात उडी घेतली. मात्र, ही दोघेही पाण्यात बुडाली. हा सगळा प्रकार बाजूला असलेल्या इतरांनी पाहिला. मात्र, मदतीसाठी ते काहीही करू शकले नाहीत. दोन्ही मुलं नदीपत्रात बुडाल्याचे लक्षात येत आहे नंतर ग्रामस्थांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, सुट्टी घालवण्यासाठी गावी आलेल्या दोन मुलांवर बुडून मृत्यू ओढवल्यामुळे गोवीळ परिसरावर शोककळा पसरली आहे. या घटनेची लांजा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.














