अलिबाग : सध्या तापमानात प्रचंड वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी आवश्यकता नसल्यास नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये. आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी केले आहे.

वातावरणातील तापमान प्रमाणाबाहेर वाढले की, शरीरातील तापमान नियंत्रण यंत्रणा कोलमडते. उष्माघात झाल्यावर चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे, स्नायूंना आकडी येणे अशी विविध लक्षणे दिसू लागतात. अशा वेळी घाबरून न जाता तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
उष्माघात होवू नये म्हणून थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे, सुती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/ टोपी, बूट वा चप्पलचा वापर करावा, प्रवास करताना पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवावी.
उन्हाळ्यात त्रास होवू लागल्यास तात्काळ जवळच्या शासकीय जिल्हा रुग्णालय अथवा तालुका किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. उष्णतेचा त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात स्वतंत्र कक्षाची सोय करण्यात आली आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. नागरिकांकरिता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सदैव सज्ज आहे. नागरिकांनी काळजी करू नये, काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी केले आहे.
