- परतीच्या पावसाचीही धुव्वाधार
- मच्छीमारांना बंदरात परतण्याच्या सूचना

रत्नागिरी : पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला असताना रविवारी ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी सकाळपासूनच पावसाने धुवाधार बरसण्यासह परतीचा प्रवास सुरू केला आहे. हा पाऊस दणका देण्याची शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकाना बंदरात परतण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कोकणात रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुढील पाच दिवस खबरदारी घ्यावी लागणार आहे.
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार रविवारी सकाळपासूनच पावसाने धुवाधार कोसळत परतीच्या प्रवासातही आपलं रौद्ररूप दाखवले आहे. अजून पूरस्थितीसारखा पाऊस नसला तरी त्याचा जोर कायम आहे.
दरम्यान, शनिवारी हवामान खात्याने संबंधित यंत्रणांना सतर्क करीत परतीचा पाऊस दणका देईल अशी शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार रविवारी सकाळपासूनच भर पावसाळ्यातल्या जून जुलैसारखे वातावरण निर्माण झाले होते.














