पनवेलनजीक मालगाडी घसरल्याचा परिणाम
रत्नागिरी : पनवेलनजीक मालगाडीला झालेल्या अपघातामुळे विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक रविवारी सायंकाळी हळुहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. यामुळे रेल्वेचे बिघडलेले वेळापत्रक पूर्णपणे सुरळीत होण्यास एक-दोन दिवसांचा कालावधी लागू शकतो. दरम्यान, मालगाडी घसरलेल्या ठिकाणचा मार्ग दुरुस्त झाला असला तरी अजूनही वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली नसल्याने कोकण रेल्वे मार्गावरील आणखी चार गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत.
या गाड्या रद्द
अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरील यापूर्वी रद्द केलेल्या गाड्यांमध्ये आणखी चार गाड्यांची भर पडली आहे. त्यामध्ये दिवा ते चिपळूण मेमू (01155), दादर -सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस, मुंबई सीएसएमटी मंगळूर एक्सप्रेस, तसेच मुंबई सीएसएमटी मडगाव ही दि. ऑक्टोबर २ ऑक्टोबरची ची गाडी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
शॉर्ट टर्मिनेट/ अंशतः रद्द केलेल्या गाड्या
दि. १ ऑक्टोबरची रत्नागिरी ते दिवा दरम्यान धावणारी (50104) ही गाडी पनवेलपर्यंत चालवण्यात आली. पनवेल ते दिवा दरम्यान ती रद्द करण्यात आली. याचबरोबर दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी (50103) पॅसेंजर गाडी दिव्या ऐवजी पनवेलपासून पुढे रत्नागिरी पर्यंत चालवण्यात आली.














