कबड्डीत मुलींची दमदार आगेकूच

मुंबई : पंचकुला (हरियाणा) येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या
मुलींच्या कबड्डी संघाने आज (शनिवार) दुसऱ्या दिवशीही विजयी घोडदौड कायम ठेवली. छत्तीसगडच्या
संघावर 62 विरूद्ध 18 असा 44 गुणांनी दणदणीत विजय मिळवित दिमाखात पुढची फेरी गाठली. या
सामन्यात महाराष्ट्राने छत्तीसगडवर तब्बल पाच लोण चढवले.
ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे कबड्डी मैदान आजही महाराष्ट्राने गाजवले. ऋतुजा अवघडी,
यशिका पुजारी आणि हरजीतकौर संधूने आजही धडाकेबाज खेळ केला. पहिल्या तीन मिनिटांत
महाराष्ट्राच्या मुलींनी छत्तीसगडच्या संघाचा अंदाज घेतला. त्यानंतर आक्रमण सुरू केले. उत्कृष्ट पकडी
आणि चढाई केल्याने गुणांची मोठी आघाडी घेता आली.
पहिल्या हाफमध्ये दोन आणि दुसऱ्या हाफमध्ये तीन असे पाच लोण महाराष्ट्राने छत्तीसगडवर
चढवले. प्रत्येक चढाईत छत्तीसगडचे गडी बाद केले जात होते. पकडीही तितक्याच कौशल्याने होत होत्या.
शेवटची दहा मिनिटे उरली असताना गुणफलक होता 41 विरूद्ध 14 महाराष्ट्राने सुरूवातीपासून
सामन्यावर मजबूत पकड ठेवली होती. परिणामी हा सामना एकतर्फी झाला.
संघाने आज चढाईत सर्वाधिक गुण मिळवले. उद्या (रविवारी) आंध्र प्रदेशसोबत लढत होणार आहे.

चमकदार खेळ

हरजीतकौर (13 गुण), मनिषा राठोड (12) यांनी चढाईत कमाल केली. डिफेन्समध्ये कोमल
ससाणे (5), यशिका पुजारी (7), शिवरजनी पाटील (4), ऋतुजा अवघडी (3), निकिता लंगोटे (2), मुस्कान
लोखंडे (2), किरण तोडकर (2) यांनीही गुण मिळवित संघाला विजय मिळवून दिला. अनुजा शिंदे आणि
हर्षदा पाटील या आज राखीवमध्ये होत्या.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE