- ‘टिळक भवन’ येथे कोकणातील जिल्हाध्यक्षांची मागणी
उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे ) : रायगडचे भाग्यविधाते अ. र. अंतुले काँग्रेसचे कणखर नेते होते, परंतु त्यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. अनेकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मात्र, महेंद्रशेठ घरत यांनी रायगडमध्ये काँग्रेस मजबूत केली आहे. रायगडचे डॅशिंग नेते म्हणून महेंद्रशेठ परिचित आहेत. त्यामुळेच निष्ठावान नेते म्हणून महेंद्रशेठ घरत घरत हेच कोकणात समर्थपणे काँग्रेस नेतृत्वाची धुरा सांभाळू शकतात, त्यामुळेच कोकणातील काँग्रेसच्या नेतृत्वाची जबाबदारी महेंद्रशेठ घरत यांच्याकडेच द्या, अशी प्रमुख मागणी कोकण विभागातील जिल्हाध्यक्षांनी महाराष्ट्राचे सहप्रभारी (कोकण विभाग) यू. बी. व्यंकटेश यांच्याकडे केली.
यावेळी या मागणीला बैठकीतील उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात साथ दिली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कोकण विभागाची बैठक शुक्रवारी (ता. २३) टिळक भवन मुंबई येथे झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी महाराष्ट्र सहप्रभारी कोकण विभाग यू. बी. व्यंकटेश यांचे स्वागत केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, “राहुल गांधी यांच्या ध्येयधोरणानुसार जिल्हाध्यक्षांना अधिकार मिळायला हवेत. आम्ही ताकदीने लढायला तयार आहोत. आमचे कार्यकर्तेही सक्षम आहेत.”
यावेळी ठाणे, पालघर, रायगड, भिवंडी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इत्यादी कोकणातील जिल्हाध्यक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी आपापली मते मांडली.
यावेळी ठाणे ग्रामीणचे दयानंद चोरघे म्हणाले, काँग्रेस भक्कम आहे, फक्त आम्हाला अधिकार द्या.
जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याबाबत या बैठकीत सांगोपांग चर्चा झाली.
या बैठकीला कोकणचे निरीक्षक राजेश शर्मा, उपाध्यक्ष गणेश पाटील, राजन भोसले, मिलिंद पाडगावकर, तसेच काँग्रेसचे कोकणातील सुमारे २०० पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
