केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात २१ सप्टेंबर रोजी उरण तहसीलवर मोर्चा

उरण दि १७ (विठ्ठल ममताबादे ) : केंद्र शासनाने लागू केलेल्या विविध धोरणाचा, निर्णयाचा निषेध करण्यासाठी व हे ध्येयधोरणे पाठीमागे घ्यावेत, यासाठी सी आय टी यु, अखिल भारतीय किसान सभा,अखिल भारतीय जनवादी महिला संघटना व डी वाय एफ आय या संघटनेच्या माध्यमातून बुधवार दि. २१ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता उरण तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. उरण चारफाटा येथे सकाळी १०:३० वा पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र जमणार आहेत व चारफाटा येथून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

मागण्या खालीलप्रमाणे 
१) महागाई कमी करण्यासाठी पेट्रोल, डिझेल व गॅस वरील वाढविलेले सेस व सरचार्ज तात्काळ रद्द करा, अनुदान पुर्ववत लागू करा. सर्व दर ५०% कमी करा.
२) रेशन व्यवस्था मोडित काढण्याची सरकारी मोहिम बंद करा. (स्वच्छेने अन्नधान्याचा लाभ सोडावा ही शासनाने जाहीर योजना मागे घ्या.) प्रती वर्षी ५ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्वांना स्वस्त धान्य रेशन द्या.
३) शहरी व ग्रामीण, सुशिक्षित व अशिक्षित सर्वांसाठी योग्य रोजगार देणारी रोजगार हमी योजना सुरु करा.

 ४) सरकारी व निमसरकारी सेवा व संस्थांमधील रिक्त जागा तात्काळ भरा.
५) बँका, विमा, वित्त संस्था तसेच अन्य सर्व सरकारी संस्थांचे खाजगीकरण करण्याच्या योजना मागे घ्या.
६) शेतकऱ्यांना दुधासहीत सर्व उत्पादनांवर योग्य हमीभाव देण्यासाठी केंद्रीय पातळीवर कायदा करा.
७) केंद्र सरकारचे कामगार विरोधी कायदे तात्काळ मागे घ्या.
८) विरोधक, पत्रकार, लेखक, कार्यकर्ते यांच्यावर लावलेले खोटे खटले आणि बनावट आरोप तात्काळ मागे घेवून घटनात्मक लोकशाही हक्काची हमी द्या.
९) दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांविरोधात द्वेष पसरविणाऱ्या आणि हिंसक हल्ले करणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर निर्णायक कायदेशीर कारवाई करा.

 १०) महाराष्ट्र वीज कंपनी करत असलेली सातत्याची दरवाढ मागे घ्या.
११) नादुरुस्त रस्ते तातडीने दुरुस्त करा. उरण-पनवेल रस्त्यावरील सिडको ऑफीसजवळील फुंडा स्टॉपजवळील ब्रिजचे नवीन बांधकाम तातडीने सुरु करा.

वाढलेली प्रचंड महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचे बाजारीकरण, केंद्र सरकारने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंवर लावलेली जी. एस. टी यांच्याविरोधात संघटित व्हा ! असा संदेश देत नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सी आय टी युचे भूषण पाटील,मधुसूदन म्हात्रे,शशी यादव,संजय ठाकूर,रविंद्र कासूकर,चंद्रकांत कोळी,सतिश खरात,अखिल भारतीय किसान सभेचे रामचंद्र म्हात्रे,संजय ठाकूर, रविंद्र कासूकर, परशुराम पाटील, भरत म्हात्रे,अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे हेमलता पाटील, अमिता ठाकूर, सविता पाटील, उषा म्हात्रे, छाया मढ़वा मढवी,डी. वाय. एफ. आयचे संतोष ठाकूर,भास्कर पाटील,राकेश म्हात्रे, दिनेश म्हात्रे, अमित पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE