कोकणात ओला दुष्काळ जाहीर करा : शौकत मुकादम


रत्नागिरी : हातातोंडाशी आलेला घास वाया जातो की काय,अशी अवस्था शेतकरी वर्गाची झाली आहे.हळवे भात तयार झाल्याने व कापणी लांबल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या नुकसान झालेल्या भात पिकाचे वस्तुनिष्ठ पंचनामे तयार करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी कृषि विभागाकडे केली आहे.

या वर्षी सुरुवातीच्या काळात पाऊस बेताचा पडला,नंतर मात्र सातत्याने पाऊस पडत राहिल्याने भात पीक जोमात आले.पंरतु वातावरणातील बदलामुळे नवरात्रीपासून जोरदार पाऊस सुरु झाला.या हंगामात भात पीक तयार होऊन कापणी सुरु होते. परंतु भात तयार झाला व मुसळधार पाऊस कोसळत राहिल्याने शेतात पाणी साचले त्यामुळे कापणी करता आली नाही.

पाऊस सातत्याने पडतच राहिल्याने काही ठिकाणी भाताची रोपे आडवी पडली आहेत. आता पूर्णपणे पाऊस गेल्याशिवाय कापणी करता येणार नसल्याने ऐन दिवाळीच्या सणात कापणीला सुरुवात करावी लागणार असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी शेतातच होण्याची शक्यता आहे. एकूणच शेतकऱ्याने वर्षभर काबाडकष्ट करून पिकविलेले धान्य हातचे जाणार असल्याने कृषि अधिकाऱ्यांनी या सर्व शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत व त्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही शौकत मुकादम यांनी केली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE