रत्नागिरी : कोकणातीलच संपूर्णत जांभ्या दगडातील कोरीव काम आणि लाकडी नक्षीदार काम असं रत्नागिरी शहरापासून काही अंतरावर असलेल्या खेडशी येथील ग्राम्रदैवत श्री महालक्ष्मी मंदिर सर्वांचंच लक्षवेधी ठरलेले आहे. या मंदिराला ‘क’ वर्ग यात्रास्थळाचा दर्जा देण्याचे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.
नव्याने बांधण्यात आलेल्या खेडशी येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा शुकवारी पार पडला. कणेरी मठाचे स्वामी अभयानंद महाराज यांच्या हस्ते कलशारोहण झालं. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. रत्नागिरीतील खेडशी येथील श्रीदेव सांब – श्री महालक्ष्मी – जुगाई – वरदान – भराडीनदेवी मंदिर कलशारोहण सोहळा राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यकमाला शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी जि. प. सभापती महेश उर्प बाबू म्हाप, चंद्रशेखर सावंत देसाई, सचिन सावंत देसाई, पिंट्या साळवी, भाविक व संबंधित उपस्थित होते. यावेळी मंत्री उदय सामंत बोलत होते. त्यांनी येथील सामाजिक सभागृहासाठी नियोजन मंडळातून 15 लाख रुपयांची भरीव तरतूद केली जाईल असेही आश्वासन दिले आहे. पुढच्या नियोजन मंडळाच्या बैठकीत रत्नागिरी तालुक्यातील खेडशी येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिराला क वर्ग यात्रा स्थळाचा दर्जा दिला जाईल, असे उद्योग मंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

















