उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शुभारंभ



रत्नागिरी दि. ६ : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत भाटये सागरी किनारा येथे जिल्हा प्रशासन आणि फिनोलेक्स कंपनी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी किनारा स्वच्छता अभियान राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. यावेळी उपस्थितांकडून स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, सरपंच प्रीती भाटकर, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी-कर्मचारी, फिनोलेक्स कंपनीचे कर्मचारी, सामाजिक संस्था आदींनी या स्वच्छता अभियानामध्ये उत्साहाने भाग घेतला.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. सागरी किनारी स्वच्छ राहिल्याने येथे पर्यटक मोठ्या संख्येने वाढतील आणि त्यामुळे रोजगारही वाढतील. प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. स्वच्छता मोहीम एका दिवसापूर्वी मर्यादित न राहता त्यामध्ये सातत्य राखणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले की, आपल्या भागातील स्वच्छता राखणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. स्वच्छतेबरोबरच चांगल्या आरोग्याची जाणीव होण्याच्या दृष्टीने धावण्याच्या स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे.














