सेवाव्रती हळबे मावशी पुस्तकाची पुढील आवृत्ती डिसेंबरमध्ये प्रकाशित होणार
देवरुख : मातृमंदिर देवरुख संस्थेच्या संस्थापिका हळबे मावशी यांचा २५ वा स्मृतिदिन नुकताच संपन्न झाला. यनिमित्ताने घेतलेल्या वाचकसंवाद या कार्यक्रमात मनोविकास प्रकाशनचे संस्थापक अरविंद पाटकर, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका दीपा देशमुख, लेखक, अर्थतज्ञ् डॉ नितीन हंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना अरविंद पाटकर यांनी सेवाव्रती हळबे मावशी हे अभिजित हेगशेट्ये यांनी लिहिलेले पुस्तक वाचताना मावशीच प्रत्यक्ष ती गोष्ट सांगताहेत असं वाटतं हे सांगितलं. मावशींच्या जीवनातील प्रसंगांची उदाहरणे देत मावशी या खऱ्या कृतिशील विचारवंत कार्यकर्त्या होत्या असं सांगत सर्वांनी हा मावशीचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करूयात असे ते म्हणाले.
मावशीवरील या पुस्तकाची नवीन आवृत्ती मनोविकास प्रकाशन प्रकाशित करत आहे. डिसेंबर २३ पर्यंत प्रकाशित होत असलेलं हे पुस्तक हळबे मावशीच्या कामाइतकंच तोलामोलाचं व्हावं याचा आम्ही प्रयत्न करत आहोत हे त्यांनी आवर्जून सांगितले. वाचकांशी संवाद साधताना त्यांनी पुस्तकं का वाचली पाहिजेत , याबाबत बोलताना द्वेषावर आधारित पुस्तके वाचण्यापेक्षा प्रेमावर आधारित पुस्तके वाचून आपण अधिक मानवतावादी होऊया असे आवाहन केले.
लेखिका दीपा देशमुख यांनी नोबेल विजेते मेरी क्यूरी व त्यांच्या कुटुंबियांबद्दल काही प्रेरणादायी घटना सांगून एकूण मानवी समाजाच्या कल्याणासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या अशा थोर व्यक्ती आणि मावशिंचे काम यातील साम्यस्थळे सांगितली. तसेच मातृमंदिरच्या या कॅम्पस मध्ये मासवण सारखंच वातावरण असल्याने अगदी माहेरी आल्यासारखं वाटलं अशा भावनादेखील त्यांनी व्यक्त केल्या. डॉ. नितीन हंडे यांनी आपले मनोगत मांडताना मावशीच्या कामाशी प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरित्या आपण सगळे मानवतेच्या धाग्याने जोडलेलोच आहोत असे सांगत मातृमंदिरच्या कामाला सदिच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात गोकुळ च्या मुलींनी सादर केलेल्या ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ या गीताने झाली. संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना करताना हळबे मावशींनी कामाची सुरुवात केलेला तेव्हाचा काळ, त्यावेळचे प्रश्न आणि या कामापुढील आव्हाने याची मांडणी केली. उपाध्यक्ष विलास कोळपे यांनी सेवाव्रती हळबे मावशी हे पुस्तक वाचून अनेक मान्यवर भारावून गेल्याचे सांगत काही निवडक प्रतिक्रिया त्यांनी वाचून दाखवल्या.
शेवटी जेष्ठ समीक्षक, लेखक डॉ सुरेश जोशी यांनी वाचक, शिक्षक, ग्रंथपाल, लेखक, संग्राहक अशा सर्व स्वरूपात त्यांचा पुस्तकांसोबत असलेला संबंध सांगत आजच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाला अशा प्रकारे थोर लेखक, प्रकाशक यांना ऐकायला मिळाल्याने खऱ्या अर्थाने मावशींचा स्मृतिचा जागर झाला असे सांगितले.
कार्यक्रमाला संस्थेचे कार्यवाह विनय पानवलकर, वाचक -लेखक डॉ वर्षा फाटक, सामाजिक कार्यकर्ते युयूत्सु आर्ते,पत्रकार प्रमोद हार्डिकर, बुधवार वाचनगट सदस्य, मातृमंदिर कर्मचारी, गोकुळ विभाग प्रवेशिता आणि मातृमंदिर मित्रपरिवार उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोकुळ बालगृहाच्या अधिक्षिका अश्विनी कांबळे यांनी केले.
