उरण (विठ्ठल ममताबादे ) : मुंबई समुद्र किनारी असलेल्या गेट वे ऑफ इंडिया ते इलिफंटा (घारापुरी-तालुका उरण ) या मार्गे समुद्रातून प्रवास करणारी नीलकमल ही खासगी बोट बुधवारी १८ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास बुडाल्याने १३ जणांचा मृत्यू झाला आहे. एका स्पीड बोटीने जोरदार अचानकपणे धडक दिल्याने प्रवाशी बोटीत पाणी शिरले. पाणी शिरल्याने प्रवासी वर्गामध्ये एकच तारांबळ उडाली. एका स्पीड बोटीने ही धडक दिल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
गेटवे ऑफ इंडिया वरून घारापुरीकडे निघालेल्या बोटीत ८० प्रवाशी होते. त्यापैकी एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. भारत सरकारच्या संरक्षण विभागाच्या (नेव्ही )स्पीड बोटीवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते.
अपघात झालेल्या नागरिकांची हेलिकॉपटरने तसेच नौदल आणि कोस्ट गार्डकडुन बचावकार्य केले गेले. इतर बेपत्ता प्रवाशांचा शोधकार्य सुरु आहे. अपघात घडल्यानंतर एका प्रवाशाने बोटीत असताना वेळेत लाईफ जॅकेट दिल्या नसल्याचा आरोप केला आहे. अपघात झाल्या नंतर पाणी बोटीत शिरल्यानंतर लाईफ जॅकेट दिले असल्याचा प्रवाशांनी सांगितले.
या संदर्भात नीलकमल या खासगी बोटीचे मालक श्री. पडते यांनी सांगितले की, एका स्पीड बोटीमुळे सदर घटना घडली आहे. स्पीड बोट ही प्रवाशी बोटीच्या आजूबाजूला फिरत होती व थोडया वेळात स्पीड बोटने प्रवाशी बोटीला जोरदार धडक दिली त्यामुळे ही घटना घडली असल्याचे त्यांनी सांगितले.
