रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर बाव नदीजवळ सळई वाहतूक करणाऱ्या ट्रकला झालेल्या भीषण अपघातात दोघा जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त हाती आले आहे. शुक्रवारी सकाळी ८. ३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. वेगवेगळ्या स्तरावर याबाबत ओरड सुरू आहे. कालपासून बांधकाम मंत्र्यांकडून रखडलेल्या या महामार्गाच्या कामाची पाहणी देखील सुरू झाली आहे.अशातच शुक्रवारी सकाळी बावनदीनजीक ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात दोन जणांनी आपला जीव गमावला आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले. लोखंडी सळईंनी भरलेल्या अपघातग्रस्त ट्रकचालक तसेच अन्य एकाचा मृतदेह पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढला आहे. हा ट्रक मुंबईच्या दिशेने चालला होता. बावनदी थांब्यानजीक चालकाचा चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे मात्र समजू शकलेली नाहीत.
