महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब पल्ल्याच्या नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रसचा शुभारंभ

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून महाराष्ट्रातील रेल्वे प्रवासाच्या इतिहासात एक नवीन अध्याय सुरू केला आहे. या उद्घाटनाच्या वेळी नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्राला मिळाली सर्वाधिक लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस
नागपूर ते पुणे दरम्यान धावणारी ही वंदे भारत एक्सप्रेस देशातील सर्व वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांमध्ये सर्वात लांब पल्ल्याचा प्रवास करणारी गाडी ठरली आहे. ही गाडी नागपूर ते पुणे हे अंतर केवळ 12 तासांत पूर्ण करेल, ज्यामुळे प्रवाशांचा बराच वेळ वाचणार आहे. ही नवीन एक्सप्रेस नागपूरहून निघाल्यावर वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल. त्यानंतर दौंड कॉर्डलाइन मार्गे ती पुण्याला पोहोचेल.


भविष्यातील नियोजनावर मुख्यमंत्र्यांनी केला भर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना, सध्या नगर-दौंड मार्गे जाणाऱ्या मार्गामुळे प्रवासाचा वेळ वाढतो, असे सांगितले. त्यावर उपाय म्हणून त्यांनी नगर ते पुणे असा थेट रेल्वे मार्ग तयार करण्याचे आवाहन रेल्वे मंत्रालयाला केले. यामुळे प्रवासाचे अंतर आणि वेळ दोन्ही कमी होईल. तसेच, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि पुणे हा महाराष्ट्राचा औद्योगिक पट्टा असल्याने, या भागाच्या विकासासाठी नवीन रेल्वे मार्ग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय, छत्रपती संभाजीनगर ते पुणे दरम्यान नवीन एक्सप्रेस-वे तयार करण्यात येणार असून, त्याच्या ‘राईट ऑफ वे’ मध्ये रेल्वे मार्गाचाही विचार केल्यास प्रवासाचे अंतर आणखी कमी करणे शक्य होईल, असेही फडणवीस म्हणाले. भविष्यात या सर्व नियोजनावर काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
ही नवीन वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्राच्या विकासाला कशी गती देईल असे तुम्हाला वाटते?

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE