रत्नागिरी : विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाडामुळे शनिवारी दुपारी विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक तीन तासांच्या प्रयत्नानंतर पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. शनिवारच्या या घटनेमुळे दिल्लीच्या दिशेने धावणाऱ्या त्रिवेंद्रम ते निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेससह नऊ गाड्यांना विलंब झाला.
सावंतवाडी येथून दिव्याकडे जाणारी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावरील वेरवली -निवसर दरम्यानच्या आडवली रेल्वे स्थानकामध्ये आली असता रेल्वे गाड्यांना वीज पुरवठा करणाऱ्या ओव्हरहेड विद्युत वाहिनीत बिघाड निर्माण झाला.
या संदर्भातील माहिती मिळताच रत्नागिरी येथून आपत्कालीन व्हॅन तातडीने घटनास्थळी रवाना झाली. जवळपास तीन तासांच्या प्रयत्नानंतर दुपारी तीनच्या सुमारास थांबलेली रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली.
वीज वाहिनीतील दोष दूर करून वाहतूक रेल्वे वाहतूक सुरू झाली असली तरी अनेक गाड्यांना विलंबाचा फटका सहन करावा लागला. यामध्ये निजामुद्दीन ते एर्नाकुलमदरम्यान धावणारी मंगला एक्सप्रेस, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस, मुंबई मडगाव तेजस एक्सप्रेस या गाड्यांसह मांडवी तसेच दिवा सावंतवाडी व सावंतवाडी दिवा या दोन्ही गाड्यांना विलंब झाला.
