रत्नागिरी : भक्कम आणि सर्वदूर नेटवर्कचे मोठमोठे दावे करणाऱ्या जिओच्या फोरजी तसेच फाईव्ह जी सेवेचा शहरानजीकच्या एमआयडीसी क्षेत्रात मागील दोन महिन्यांपासून अक्षरशः बोजवारा उडाला आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या रत्नागिरी शहरालगतच असलेल्या मिरजोळे एमआयडीसी परिसरात जवळपास मागील दोन महिन्यांपासून जिओच्या डेटा सर्विसमध्ये अडथळा निर्माण झाला आहे.
याबाबत चौकशी केली असता रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे ऑप्टिकल फायबर केबल जेसीबी उत्खननादरम्यान तुटत असल्याचे कारण सांगण्यात आले. मात्र, कॉलिंग सेवा मिळत असतानाच डेटा सर्विस मिळण्यात अडचण निर्माण होत असल्याने अनेक ग्राहक पर्यायी मोबाईल सेवेकडे वळत आहेत. मागील दोन महिन्यांपासून याच्यात सुधारणा होत नसल्याने मोठ्या रकमेची रिचार्ज मारून देखील डेटा सेवेचा लाभ घेता येणे अशक्य झाले आहे.
एमआयडीसी क्षेत्रातील ओकटेल कंपनी, नवनिर्माण कॉलेज फिनोलेक्स कॉलेज, गद्रे कंपनी तसेच एमआयडीसी विश्रामगृह परिसरात मागील जवळपास दोन महिन्यांपासून ही समस्या भेडसावत आहे. मात्र मोठमोठे दावे करणाऱ्या सेवा पुरवठादार कंपनीला त्याकडे लक्ष देण्यासाठी वेळचं नाही. वेगवेगळी आमिषे दाखवून ग्राहक बेस तयार झाला पण समाधानकारक सेवा पुरवण्याकडे कंपनीचा कल असल्याचे दिसत नाही. याबाबत जिओच्या ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.
