उरण दि 17 (विठ्ठल ममताबादे ) : उरण आगारात कोरोना काळ संपल्यावर देखील कमी झालेल्या गाड्यांची संख्या अजूनपर्यंत न वाढवल्यामुळे विविध मार्गावर फेऱ्यांची संख्या कमी झालेली आहे.एस टी गाड्या वाढविण्यासाठी तसेच विविध मार्गावर जास्तीत जास्त फेऱ्या वाढवाव्यात यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शहर चिटणीस शेखर पाटील यांनी शिष्ट मंडळ समवेत डेपो मॅनेजर सतीश मालचे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
उरण तालुक्यातील गावांना सोडणाऱ्या बसेस ,पनवेल व दादर पहाटे साडेचार वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंतच्या फेऱ्या बंद आहेत. तसेच लांब पल्याच्या ठराविक गाड्या वगळता बसेस बंद आहेत. याचा फटका विद्यार्थी कामगार वर्ग व प्रवाशी वर्ग यांना बसतो आहे. सर्वसामान्य माणसाला परवडेल अशी बससेवा नियमित नसल्याने प्रवाशी वर्गाची नाराजी आहे. कोरोना काळाच्या आधी एकूण 52 बसेस असताना त्या सध्या 39 असल्याचे डेपो मधून सांगण्यात आले.यामुळे उरण डेपोच्या उत्पन्नात घट झाली आहे.त्यामुळे गाड्यांची संख्या वाढवावी, फेऱ्या वाढवावी.तसेच करंजा ते मोरा अशी बससेवा सुरू करावी. गौरी गणपती सणानिमित्त कोकणात व घाटमाथ्यावर गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी प्रवाशांच्या वतीने करण्यात आली. यावेळी डेपो मॅनेजर सतीश मालचे यांनी एस गाड्या वाढविण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस शेखर पाटील, तालुका सहचिटनिस यशवंत ठाकूर, तालुका महिला आघाडी अध्यक्षा सीमा घरत, शहर अध्यक्षा नयना पाटील, शहर उपाध्यक्षा रंजना पाटील,शहर पदाधिकारी शंकर भोईर, दिलीप पाटील उपस्थित होते.
![](https://digikokan.com/wp-content/uploads/2022/08/ST-1024x469.jpg)