रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला ऑगस्ट महिन्यातील आतापर्यंतचा प्रवासी प्रतिसाद हा ९५ टक्के इतका लाभला आहे. तिकीट दर अधिक असतानाही स्वदेशी बनावटीच्या या गाडीला प्रवाशांचा मिळणारा हा प्रतिसाद रेल्वेच्या तिजोरीत भर टाकणारा ठरला आहे.
दिनांक 27 जून 2023 रोजी मडगाव मुंबई मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चा शुभारंभ झाला. तेव्हापासून या गाडीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी कणकवली, थिवी असे थांबे देण्यात आले आहेत.
दि. २७ जून रोजी शुभारंभ झाल्यानंतर आधी केवळ क्रेझ म्हणून या गाडीला प्रतिसाद लाभत असल्याचे सांगितले जात होते. मात्र प्रत्यक्षात वंदे भारत एक्सप्रेसमधील सुविधांचा विचार करता या गाडीचा प्रतिसाद कमी होताना दिसत नाही. रेल्वेला वातानुकूलित गाडी चालवण्यासाठी अपेक्षित असलेली किमान उत्पन्न मर्यादा या गाडीने कधीच ओलांडली आहे. ऑगस्टमधील आतापर्यंत मुंबई मडगाव या गाडीला (22229) ९५ टक्के इतका प्रवासी प्रतिसाद लाभला आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने ही माहिती दिली आहे.
मध्य रेल्वेच्या सर्वच वंदे भारत एक्सप्रेस हाऊसफुल्ल!
- गाडीची फेरीवाईज प्रवासी ऑक्युपेन्सी प्रमाण
१) 20825 बिलासपूर-नागपूर- १०४%
२) 20826 नागपूर-बिलासपूर- ८६%
३) २२२२५ सीएसएमटी-सोलापूर- ९५%
४) 22226 सोलापूर-सीएसएमटी- ९४%
५) २२२२९ सीएसएमटी-गोवा- ९५%
६) 22223 सीएसएमटी-शिर्डी- ८०%
७) २२२२४ शिर्डी-सीएसएमटी- ७८%