Ultimate magazine theme for WordPress.

अवैध पार्किंग विरोधात सोनारी ग्रामस्थ आक्रमक

0 50

उरण (विठ्ठल ममताबादे ) : सोनारी गावालगताच्या आजूबाजूच्या परिसरात, करळ गावाच्या आजूबाजूच्या परिसरात, करळ उड्डाणपूल, स्पीडी कंपनीच्या मार्गांवर नेहमी होणारे कंटेनर, मालवाहू वाहने यांचे अवैध व बेकायदेशीर पार्किंग सोनारी ग्रामस्थांची डोकेदुखी ठरत आहे. या अवैध पार्किंगमुळे अनेकांचे जीव गेले असून काही जणांचे अपघात देखील झाले आहेत. मात्र एवढे होऊन सुद्धा वाहतूक पोलीस प्रशासनाचे या अवैध पार्किंग कडे नेहमी दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे वाहतूक शाखेचे कार्यालय येथे हाकेच्या अंतरावर आहे. वारंवार सोनारी ग्रामस्थांनी, विविध सामाजिक संस्थांनी अनेकवेळा कायदेशीर पत्रव्यवहार करून देखील ही समस्या सुटत नसल्याने  दि 20/5/2022 रोजी दुपारी 4 वाजता सोनारी ग्रामस्थ हे रस्त्यावर उतरले.


सोनारी गावाचे, करळ गावाचे आजूबाजूचे परिसरात, करळ उड्डाणंपूल परिसरात नवीन ब्रिजखाली येथे दररोज मोठ्या प्रमाणात कंटेनर, अवजड वाहतूक याची बेकायदेशीर, अवैध पार्किंग होत असते. अजूनही हे सुरु आहे. पोलीस प्रशासन नेहमी थातूर मातुर कारवाई करते, तात्पुरती कारवाई करते मात्र पुन्हा अवैध वाहतूक सुरु होते. या मार्गांवर अनेकांचे प्राण गेले तरी प्रशासनाला अजूनही जाग येत नसल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. जर ही समस्या सुटली नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्पर्श सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा अल्पा कडू, अभिनेत्री अनघा कडू, अंकिता कडू व ग्रामस्थांनी दिला आहे.अवैध, बेकायदेशीर पार्किंग मुळे एखाद्याचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित केला. एखाद्याचा जीव गेला तर पोलिसांनी खोटी सहानुभूती दाखविण्यासाठी येऊ नये. यासाठी अपघात होऊच नये, एखाद्याचा जीव जाऊच नये यासाठी पोलीस प्रशासनाने अगोदरच उपाययोजना करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. करळ, सोनारी परिसरात, करळ उड्डाणंपूल, स्पीडी कंपनी मार्गांवर अवैध बेकायदेशीर पार्किंग होऊ नये. या परिसरात बेकायदेशीर अवैध पार्किंग बंद करावी अशी मागणी निवेदना द्वारे सोनारी ग्रामस्थांनी हेड कॉन्स्टेबल एन डी म्हामुणकर वाहतूक विभाग न्हावा शेवा विभाग यांच्याकडे केली आहे.

यावेळी हेड कॉन्स्टेबल एन डी म्हामुणकर यांनी सदर वाहने बेकायदेशीर अवैध पार्किंग करत असल्याचे सांगत सदर समस्या वर ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन यांच्यात बैठक घेण्याचे आश्वासन दिले.यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच पूनम कडू, स्पर्श सामाजिक संस्थेचे अध्यक्षा अल्पा कडू, माजी शिवसेना शाखा प्रमुख दिनेश कडू,ग्रामस्थ  -प्रदीप कडू, नारायण कडू, दिनेश कडू, अल्पेश कडू ,आशिष कडू,योगेश कडू,हरिश्चंद्र कडू, सुनिल कडू, दिपक म्हात्रे, निखिल कडू, सुजाता कडू, अल्पा कडू, पूनम कडू, रेश्मा कडू, आश्विनी कडू, अनघा कडू, वासंती कडू, अंकिता कडू, प्रणाली कडू, ममता कडू आदी सोनारी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.