Ultimate magazine theme for WordPress.

आपत्तीत धोके टाळण्यासाठी शाश्वत उपाययोजना कराव्यात : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

0 25

नाशिक: दि. 16 जुलै : – जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी आपत्ती सदृश  परिस्थिती निर्माण झालेली आहे. या आपत्तीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयासोबतच शाश्वत स्वरूपाचे उपाय करण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागातील उपाय योजनांचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी घेतला याबैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी., अपर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेजा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एन.एम.खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ, अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी (जि. प). डॉ.कपिल आहेर उपस्थित होते.

यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड उपस्थित होत्या.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार पुढे म्हणाले की, आपत्ती काळात जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग,गृह विभाग या सर्व विभागांची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे या सर्व विभागांनी एकमेकांच्या सतत संपर्कात राहून आपत्ती काळात निरंतर सेवा द्यावी.

पावसाळ्यानंतरच्या उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवरही भर देण्यात यावा. वाढणारे पाणी लक्षता घेता धरणे, बंधारे याबाबत दक्षता घेण्यात यावी, असेही डॉ.पवार यांनी यावेळी सांगितले.

वाहतूक नियंत्रण प्रणालीचा करावा अवलंब

सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर झालेले खड्डे तात्काळ बुजवण्यावर भर देण्यात यावा. ज्या पुलांवरुन पाणी जात असेल अशा ठिकाणी सूचना फलक, डिजिटल फलक लावण्यात यावे. तसेच पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, काही बंधाऱ्यांचे भराव वाहून गेले असतील त्या ठिकाणी तात्काळ भराव करण्यात यावा. नाशिक-मुंबई रस्त्यावर वाहतुकीच्या कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याने त्या ठिकाणी मोठ्या वाहनांना मार्गदर्शन करण्यासाठी पथके तैनात करण्यात यावीत. तसेच वाहतुक कोंडी व अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियंत्रण प्रणाली राबवावी, अशा सूचना संबधित यंत्रणेला यावेळी डॉ.पवार यांनी दिल्या आहेत.

पावसाळातील साथरोग नियंत्रणासाठी सतर्क रहावे

सततच्या पावसामुळे संपर्क तुटलेला गावांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी थांबण्याचा सूचना देण्यात याव्यात. पावसाळ्यानंतर उद्भवणाऱ्या साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने सतर्क रहावे. गावागावात शुद्ध पाणी पिण्याबाबत जनजागृतीसाठी सर्व ग्राम समित्यांना जिल्हा परिषदेने सूचित करावे. यासाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची मदत घेण्यात यावी. ग्रामीण भागातील ज्या गर्भवती महिलांची प्रसूती जवळ आली असेल अशा महिलांना तात्काळ उपचार मिळण्यासाठी इमर्जन्सी  रोड मॅप तयार करण्याच्या सूचना यावेळी डॉ.पवार यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत

अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावे. तसेच अनेक ठिकाणी आपत्तीमुळे घरांचे नुकसान झालेले असून अशा ठिकाणी निवासी गृह तयार करुन नागरिकांची राहण्याची सोय करावी. तसेच कुणी उपाशी राहू नये यासाठी जेवण पोहचविण्याची व्यवस्था करावी. आवश्यक तिथे गावकऱ्यांची व विविध सामाजिक संस्थाची मदत घेण्यात यावी.

जिल्हाधिकारी गंगाथरन.डी. यांनी यावेळी जिल्ह्यातील झालेले पर्जन्यमान, धरणसाठा, मनुष्यहानी, जनावरांची हानी, स्थलांतर कुटुंब, कृषी आदी विषयांची माहिती यावेळी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.