नुकसानग्रस्त बंधाऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
![](https://digikokan.com/wp-content/uploads/2022/07/DSC_4025-scaled-1-1024x593.jpg)
नागपूर, दि. 16 : गत तीनचार दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस होत आहे. अतिवृष्टीमुळे कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा ॲशपाँड फुटल्याने परिसरातील खसाळा, मसाळा, खैरी, कवठा, सुरादेवी या पाच गावांत पाणी शिरले. यात कुठलीही जीवितहानी झाली नसून सायंकाळपर्यंत पुराचे पाणी ओसरले आहे. परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. जिल्हा प्रशासनाव्दारे त्याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन चमूला पाचारण करण्यात आले असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या तसेच नागरिकांना आवश्यक मदत पुरविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज दिल्या. गावात पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले असल्यास तातडीने सर्वेक्षण करण्याबाबतही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी आज स्वत: प्रत्यक्षरित्या क्षतिग्रस्त बंधाऱ्याची व परिसराची पाहणी केली. विधानपरिषद सदस्य आमदार चंद्रशेखर बावनकुळे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता (स्थापत्य) राजेश कराडे, अधीक्षक अभियंता (स्थापत्य) शिरीष वाठ, मुख्य अभियंते अभय हरणे, राजकुमार तासकर, जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते आदी यावेळी उपस्थित होते.