Ultimate magazine theme for WordPress.

पावसाळा आणि आपत्ती व्यवस्थापन

0 44

पावसाळा सुरु झाला आणि पावसाने जोर धरला की,  विविध ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडतात.
पावसाळयात दरडी कोसळण्याचे मुख्य कारण म्हणजे, उन्हाळ्यात डोंगरकड्यांवरील खडक तापतात आणि सैल होतात.
पावसाळ्यात खडकाला पडलेल्या भेगांमधून त्याची रुंदावण्याची प्रक्रिया सुरू होते. जोराचा पाऊस पडल्यावर दगड
उतारच्या दिशेने कोसळतात. घाट रस्ते हे तीव्र उताराचे डोंगर उभे कापून केलेले असतात. तसेच, पर्वतात बोगदे
खणल्यामुळे, डोंगर उतारांवर शेतीसाठी, शेततळ्यांसाठी, घरे बांधण्यासाठी सपाटीकरणामुळे, चर खणल्यामुळे तसेच
जंगलतोडीमुळे डोंगरउतार धोकादायक होऊ लागतात. अशा मानवी अतिक्रमणामुळे अतिवृष्टीदरम्यान दरडी कोसळतात. दर
वर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये राज्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या
होत्या. त्यात दीडशेहून अधिक नागरिकांना प्राण गमवावा लागला. प्रतिकूल पर्यावरण, अतिवृष्टी आणि भूकंपप्रवणता या
नैसर्गिक कारणांबरोबरच डोंगरउतारांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मानवी अतिक्रमणांमुळे समतोल ढळतो. क्रिया बल व
प्रतिक्रिया बल यांची परिमाणे समान असतात. परंतु, त्यांच्या दिशा परस्परविरोधी असतात, हा न्यूटन या शास्त्रज्ञाचा
गतीसंबंधीचा तिसरा नियम आहे. डोंगर उतार असमतोल करणारे मानवी अतिक्रमण ही झाली क्रिया आणि त्यामुळे समतोल
ढळून दरडी कोसळणे ही निसर्गाची प्रतिक्रिया हे लक्षात घ्या. निसर्गात आपण केलेले बदल म्हणजे ‘कुऱ्हाडीचा दांडा, गोतास
काळ’ हे विसरुन चालणार नाही.
         पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे कोकणातील चिपळूण आणि महाड हे दोन शहरं संपूर्ण पाण्याखाली गेली होती.
त्यातच दरड कोसळल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. पण, यामागे नेमकी काय कारणं आहेत? दरड का कोसळते, दरड
कोसळण्यापूर्वी निसर्गाकडून काही पूर्वसूचना मिळतात का, मानवनिर्मित कारणांमुळेही दरड कोसळते का, दुर्गम भागात,
डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी पावसाळ्यात काय काळजी घेतली पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी
‘न्यूटन जागवा; दरडी थोपवा’ या अभियानांतर्गत पर्यावरण दिनापासून (५ जून) संपूर्ण राज्यात विशेष उपक्रम राबविले जात
आहे. ज्येष्ठ भूगर्भ अभ्यासक आणि राज्याच्या भूस्खलन निवारण समितीचे सदस्य डॉ. सतीश ठिगळे यांच्या पुढाकाराने
‘न्यूटन जागवा; दरडी थोपवा’ अभियान राबविले जात आहे. डॉ. ठिगळे यांनी गेल्या वर्षी दरडी कोसळलेल्या प्रत्येक
ठिकाणची पाहणी केली.  नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ठिगळे यांनी ‘ट्रेन द ट्रेनर’, बिनभिंतीची कार्यशाळा आणि
‘न्यूटन जागवा; दरडी थोपवा’ या पुस्तकांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले आहेत. नुकतेच श्री. ठिगळे यांनी दरडींबाबतची
संपूर्ण शास्त्रोक्त माहिती देणारे पत्रक प्रसारित केले आहे.
          १९८९ साली भाजे येथे ३८, २००५ साली महाड परिसरात कोडीवते, रोहन, दासगाव, जुई, येथे १९८, २०१४
साली माळीण येथे १५०, तर अलीकडे २०२१ मध्ये तळीये, पोसरे, ढोकावळे, आंबेघर, मिरगाव या ठिकाणी दरडी कोसळून
१३० व्यक्ती ठार झाल्या. या सर्व घटना घडण्यापूर्वी निसर्गाने काही न काही धोक्याच्या पूर्वसुचना दिल्या असणारच पण त्या
सुचना ओळखता न आल्याने या दूरघटना घडल्या.
दरडींची लक्षणे -: १. डोंगर उतारांना तडे जाणे व तडे गेलेला भाग खचू लागणे, घरांच्या भिंतींना भेगा पडून पडझड होणे,
झाडे, विद्युत खांब, कुंपणे कलणे. २. नवीन झरे निर्माण होणे, जुने झरे रुंदावणे, त्यांच्यातून मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी
बाहेर येणे. ३. विहिरींतल्या भूजल पातळीमध्ये अचानक वाढ किंवा घट होणे. 4. अतिवृष्टी होत असताना झऱ्यांची पाणी
देण्याची क्षमता अचानक वाढते. त्यांतून गढूळ पाणी येणे. 5.झाडे उमळून पडतात, तारांची कुंपणे, विद्युत खांब उचकटतात.
6.भात खाचरांना भेगा पडणे, जमिनीला हादरे बसणे.

डोंगरभागात राहणाऱ्या नागरिकांना ही लक्षणे त्वरीत ओळखता आली पाहिजेत, परिस्थितीचा अंदाज घेऊन त्या
जागेवरुन तत्काळ स्थलांतर केले पाहिजे. धोक्यापासून तत्काळ दूर होऊन जीव वाचवला पाहिजे. पिढ्यान् पिढ्या नांदत
असलेल्या घरापासून दूर कसे जायचे, पावसाळ्यात असं घडणारच, होईल थोड्या वेळात पूर्ववत, असे विचार झटकून टाकून
प्रश्न फक्त स्वत:चा नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबाचा, पुढील पिढीच्या जीवन-मरणाचा आहे हे लक्षात घेऊन सुरक्षित
ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. पूर्वतयारी म्हणून बँकेची कागदपत्रे, सोने-नाणे, पैसाआडका, औषधे यांची
जुळवाजुळव करून ठेवावी. प्रथम वृद्ध, आजारी माणसे, लहान मुले आणि जनावरांना हलवण्यास प्राधान्य द्यावे.
अशा दुदैवी घटना घडू नये यासाठी काही आपल्या हातात असलेल्या गोष्टी केल्या तर निसर्गाच्या प्रकोपापासून
आपण आपले आपल्या कुटुंबियांचे आणि प्राण्यांचेही जीव वाचवू शकतो. यासाठी बांबूची लागवड व वनीकरणास प्रोत्साहन
देणे, भूजलाचा जलद निचरा करणे, संरक्षक भिंती आणि जाळ्या बसवणे. पावसाळ्यात डोंगर उतारांचे निरीक्षण करा
शिक्षकांच्या मदतीने गावचे नकाशे प्राप्त करून डोंगर उतारावरील धोकदायक दरडींचे नकाशे तयार करणे,पूररेषा आखणे,
गावाच्या पर्यावरणीय समस्यांबाबत पथनाट्य, पोवाडे, इत्यादींद्वारे जनजागृती घडवणे, धोकादायक परिसराचे व्हिडिओ
चित्रीकरण करून पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांना पाठविणे. असे लहान सहान उपाय जरी आपल्या स्तरावर केले
तरी आपण आपले व इतरांचे प्राण वाचवू शकतो. ज्या ज्या वेळी अशा घटणा घडल्या आहेत. त्या त्या वेळी शासनाने तत्काळ
मदत पूरविली आहे.  अशा संकटाच्या वेळी नेहमीच शासनाने नागरिकांना खंबीरपणे आधार दिला आहे.  
शासनाने यासाठी आपत्ती व्यवस्थापनाबाबत विशेष काळजी घेतली आहे. शासनाच्या सर्व विभागांच्या समन्वयाने
आपत्तीवर मात केली जाणार आहे. यासाठी नागरिकांनी देखील खबरदारी घेणे आवश्यक आहे.

-प्रविण डोंगरदिवे
माहिती सहाय्यक
विभागीय माहिती कार्यालय
कोकण विभाग, नवी मुंबई

Leave A Reply

Your email address will not be published.