केंद्रीय पथकाकडून प्रत्यक्ष जागेवर लवकरच पाहणी : प्रमोद जठार
राजापूर : राजापूर तालुक्यात धोपेश्वर- बारसू, गोवळ परिसरात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला आता अंतिम स्वरूप आले आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून याबाबत आता सकारात्मक निर्णय होणार असून हा प्रकल्प राजापुरात उभारण्याबाबत आता हिरवा कंदील मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर राजापुरात भाजपा राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने रविवारी 29 मे रोजी रिफायनरी प्रकल्प स्वागत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार प्रमोद जठार यांनी सोमवारी राजापुरात पत्रकार परिषदेत दिली.
रविवारी 29 मे रोजी सायंकाळी 4 वाजता राजापूर शहरातील गुजराळी येथील श्री मंगल कार्यालयात हा स्वागत मेळावा होणार आहे.
या रिफायनरी प्रकल्प स्वागत मेळाव्याच्या माध्यमातुन रिफायनरी प्रकल्पाबाब असलेले गैरसमज दूर करतानाच या प्रकल्पाच्या माध्यमातुन काय हवे आणि काय झाले पाहिजे याची चर्चा करून तशा मागण्यांचा अहवाल एक शिष्टमंडळ केद्रीय उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पेट्रोलिअयम मंत्री हरदीप सिग पुरी यांची भेट घेऊन त्यांना देणार असल्याचेही जठार यांनी यावेळी सांगितले.
राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाचे सर्वत्र स्वागत होत आहे. राज्य शासनाने केंद्र सरकारला पत्र देऊन या प्रकल्पासाठी जागा देण्यात येणार असल्याचे कळविले आहे. तर सर्वच राजकिय पक्षांनी या प्रकल्पाचे स्वागत केले आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला असून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत हालचाली गतीमान झाल्याचे जठार यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकार संवाद सुरू झालेला असतानाच आता कंपनी आणि राज्याचे औद्योगिक विकास महामंडळाकडूनही या प्रकल्पाच्या जमिन संपादन व अन्य प्रक्रियेला वेग आला आहे. तर केंद्रीय पथकाकडून प्रत्यक्ष प्रकल्पस्थळावर पाहणी करून तांत्रिक बाबीही तपासल्या जात असल्याचे जठार यांनी सांगितले.
![](https://digikokan.com/wp-content/uploads/2022/05/refanary-1024x576.jpg)
![](https://digikokan.com/wp-content/uploads/2022/05/23rp30-1024x402.jpg)
राजापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना प्रमोद जठार याप्रसंगी अभिजित गुरव, उल्का विश्वासराव, सौ. शृती ताम्हनकर आदी.