Ultimate magazine theme for WordPress.

रिफायनरी समर्थनाच्या घोषणांनी राजापूर दणाणले

0 42

रिफायनरी समर्थनासाठी जोरदार घोषणाबाजी; सर्वपक्षियांची उपस्थिती

राजापूर : राजापूर शहरानजीकच्या धोपेश्वर येथील पाटीलमळा यशोदिनसृष्टी येथे रिफायनरी समर्थन मेळाव्याला राजापूर तालुक्यातील नागरिकांनी रविवारी उत्स्फूर्त उपस्थिती लावली होती. रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्याच्या बाहेर जाऊ नये तो तालुक्यातच मार्गी लागावा आणि कोकणचा विकास व्हावा, या भावनेने प्रकल्पाच्या समर्थनार्थ राजापुरात आयोजित मेळाव्याला मोठा जनसमुदाय लोटला होता. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, अशा बुलंद घोषणांनी सभागृह दणाणून गेले. मेळाव्याला उपस्थित सर्वपक्षीय नेते मंडळींसह मान्यवरांनी कोकणातील वाढत्या बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करुन प्रकल्पाला विरोध करणार्‍यांचा जोरदार समाचार घेतला.
कोकणात दर्जेदार शिक्षण, उत्तम आरोग्य सुविधा, दळणवळण यांच्या सुविधा निर्माण व्हाव्यात. कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आम्हाला या रिफायनरी प्रकल्पाची नितांत गरज आहे. या पूर्वी काही एन. जी. ओं.च्या भूलथापाना बळी पडून नाणार येथील स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. मात्र, आता ती चूक आम्ही पुन्हा करणार नाही, असे स्पष्ट करत धोपेश्वर परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी या समर्थन मेळाव्याला हजेरी लावली होती.
सकारात्मक मनाचे व घरोघरी आनंद निर्माण करण्याचे सामर्थ्य असणार्‍या या प्रकल्पाची मुहूर्तमेढ राजापुरातच व्हावी, यासाठी राजापूरवासीयानी कंबर कसली आहे. राजापूर तालुक्यातील विविध 57 सामाजिक संघटना, 130 ग्रामपंचायती, सर्व राजकीय पक्ष यानी एकत्र येत हा रिफायनरी प्रकल्प राजापूरातच व्हावा यासाठी या समर्थन मेळाव्याचे आयोजन केले होते. रिफायनरी प्रकल्प समन्वय समीती राजापूर – धोपेश्वरचे कार्याध्यक्ष महेश शिवलकर यांनी रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्याला काय सुविधा मिळणार आहेत याची माहिती उपस्थिताना प्रस्ताविकामध्ये दिली.
रिफायनरी प्रकल्पातून निघणार्‍या कार्बनडाय ऑक्साईड या वायूपासून कार्बन सिट बनवल्या जातात. ही ग्रीन रिफायनरी आहे. त्यामुळे यातून प्रदूषण होत नाही. पर्यावरणाची सर्व मानके या प्रकल्पामध्ये पाळली जातात अशी माहिती रिफायनरीचे अभ्यासक आशिष कीर यानी बोलताना दिली.
नाणार येथे होणार्‍या रिफायनरी प्रकल्पाविरोधात सातत्याने विरोधाची भूमिका घेऊन स्थानिकांची माथी भडकविण्याचे काम या पूर्वी झाल्यानंतर शासनाने नाणार रिफायनरीची अधिसूचना रद्द केली होती. जरी नाणारमधून हा प्रकल्प रद्द झाला असला तरी तो कोकणातून आणि राज्यातुन बाहेर जाऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असून तो प्रकल्प धोपेश्वर परिसरात मार्गी लागावा, यासाठी प्रयत्न सुरु झाले त्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राजापूर शहरातील पाटीलमळा येथे रिफायनरीच्या समर्थनार्थ एका भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला मोठा प्रतिसाद लाभला.
तालुक्यासह जिल्ह्याच्या अनेक भागातून नागरिक रिफायनरीच्या समर्थनार्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. यामध्ये विधान परिषद माजी आमदार हुस्नबानू खलिफे, भंडारी महासंघाचे अध्यक्ष निवीनचंद्र बांदिवडेकर, माजी जि. प. अध्यक्ष राजाभाऊ लिमये, डॉ. छाया जोशी, अ‍ॅड. विलास पाटणे, डॉ . सुनिल राणे उपस्थित होते.
दंगल नियंत्रण पथक तैनात
रिफायनरी प्रकल्प समर्थन सभेच्या ठिकाणी कोणणातही अनुचित प्रकार ाडू नये, यासाठी दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. या वेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मेळाव्यला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

Leave A Reply

Your email address will not be published.